Mahesh Mhatre

गेल्या दोनेक वर्षापासून, जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी होऊ लागली तेव्हा पुन्हा मराठी लोकांना ‘गाथा सप्तशती’ची आठवण झाली. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमून राज्य सरकारने मराठी कशी अभिजात भाषा ठरते, याचा अहवाल मागवला आणि त्याच गडबडीत उत्तम वाङ्मय प्रसिद्ध करणा-या अरुण जाखडे यांनी ‘गाथा सप्तशती’ नव्या रूपात छापली. हा आद्य मराठी ग्रंथ म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे सांस्कृतिक लेणे आहे.. त्याचा अभिमान बाळगताना आम्ही चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, नरेंद्र, तुकाराम, जनाबाई, बहिणाबाई या एकाहून एक सरस मराठीप्रेमींचे स्मरण केलेच पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य चळवळीत मराठीला पुन्हा एकदा लोकभाषेकडून राजभाषेकडे नेण्याचा जो यशस्वी प्रयत्न झाला, त्याचेही स्मरण केले पाहिजे आणि हा सारा खटाटोप करणा-या आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकरांसह लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, लोकहितवादी ते आचार्य अत्र्यांपर्यंतच्या थोर संपादकांचे ऋण मान्य केले पाहिजे; पण त्याच जोडीला स्वातंत्र्य चळवळ आणि दुस-या महायुद्धानंतर बदललेल्या सामाजिक स्थितीत सर्वसामान्य मराठी माणसाला वाङ्मयीन अस्तित्व देणा-या नव्या ‘धारे’च्या साहित्य चळवळींचेही कौतुक झाले पाहिजे. नामदेव ढसाळांनी दलित जाणिवांचा विश्वव्यापी प्रत्यय देताना मराठी साहित्याला वेगळे आत्मभान दिले तर नेमाडे, पाध्ये यांनी ग्रामीण आणि शहरी जीवनातील उपेक्षित कथाविषयांना अक्षरश: आकाशाएवढे केले. मी ‘कोसला’ किंवा ‘वासुनाका’तील पात्रांच्या भाषेत बोलणा-या पिढीतील असल्यामुळे आजच्या ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर ‘बाता मारणा-या पिढीबद्दल मला प्रेम वाटते. त्यामुळे एखाद्याच्या डॅशिंग फेसबुक प्रोफाइलवर जेव्हा ‘सर्व मुलींचा दावा आहे, गौरांग छावा आहे,’ अशी कॉमेंट वाचायला मिळते, तेव्हा आपल्या बदलत्या पिढीची, बदलती भाषा समजते.
Read More …

कडवे हिंदुत्व हाती घेऊन निघालेल्या भाजपने गेल्या काही महिन्यांपासून देशात सर्वत्र ‘मोदी लाट’ आली असल्याचा आभास निर्माण केला असताना काँग्रेसला मागे सारून ‘आम आदमी’ने मोदींची उन्मादी घोडदौड रोखली. इतकेच नव्हे तर मोदित्वासाठी ‘दिल्ली दूर आहे’ असा स्पष्ट इशारा ‘आम आदमी’ने देणे, हा खरे तर गांधी-नेहरू यांनी रुजविलेल्या सर्वधर्मसमभाव आणि शांतिपूर्ण सहजीवनवादी प्रेरणांचा विजय आहे. सबंध देश महागाई, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार अशा त्रिविध तापांनी पोळून निघत असताना सर्वसामान्य माणसाला चांगल्या शासनव्यवस्थेशिवाय अन्य पर्याय नको आहे, पण त्याकडे लक्ष न देता, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पारंपरिक राजकारणावरच भर दिला. म्हणूनच दिल्लीतील मतदारांनी कोणताही अनुभव नसलेल्या ‘आम आदमी पक्षा’च्या २८ उमेदवारांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असावा. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या भाजप प्रभावक्षेत्रातील राज्यात समर्थ पर्याय नसल्यामुळे गप्प राहणा-या मतदारांनी दिल्लीत ‘आप’ला प्राधान्य दिले, परिणामी ‘मोदी लाट’ आल्याचा, ‘हिंदुत्वाची पहाट’ झाल्याचा भाजपचा दावा फुसका ठरला. या अनपेक्षित फटक्यामुळे गोंधळलेल्या भाजपला ‘आम आदमी पक्षा’संदर्भात कोणतीच भूमिका ठरवता न आल्यामुळे राजकीय गुंता वाढत गेला. वास्तविक पाहता, ‘आम आदमी’ने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता, पण एरवी रा. स्व. संघाचे तथाकथित संस्कार आणि साधनशुचितेच्या गप्पा मारणा-या भाजपचा स्वत:वरील विश्वास उडत चालला आहे. म्हणूनच दिल्लीत सत्ता स्थापून ‘आम आदमी’च्या विरोधात उभे राहण्याची भाजपकडे हिंमत नाही, मग असा पक्ष काँग्रेसला पर्याय म्हणून कसा उभा राहणार?
Read More …

विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणा-या संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्राला वारसा आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून सगळेच बिनसलेले दिसते आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाचा अद्याप तपास लागलेला नाही. ज्या सनातनी वृत्तीच्या लोकांनी डॉ. दाभोलकरांना मृत्यूनंतरही सोडले नाही तेच लोक आता अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी विधेयकाची प्रक्रिया रोखायची भाषा करताहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करवून घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करणा-या सनातनी हिंदुत्ववाद्यांनी वारक-यांच्या काही स्वयंघोषित ‘प्रवक्त्यां’ना पुढे केले आहे. समाजात संभ्रम निर्माण करून विधेयकाला विरोध करण्याचा, हा डाव वेळीच हाणून पाडणे गरजेचे आहेच. त्याचबरोबर वारकरी संप्रदायात घुसलेल्या बोगस अनिष्ट आणि आत्मघातकी गोष्टी बाहेर घालवणेसुद्धा निकडीचे बनले आहे. एकेकाळी महाराष्ट्राचा आचारधर्म म्हणून ओळखला जाणारा हा भागवत धर्म आठशेंहून अधिक वर्षे मराठी समाजमन घडवत आला आहे. त्याचे ते मोठेपण पुढील पिढय़ांच्या हाती देण्याची निसर्गदत्त जबाबदारी आपल्या पिढीवर आहे.. ‘ एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. ते विसरून आपल्याला पुढील वाटचाल करता येणार नाही.
Read More …

सध्या देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वेगाने वाढताना दिसताहेत. काही समाजतज्ज्ञांच्या मते शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांकडून महिलांविरोधी सर्वच घटनांची प्राधान्याने दखल घेतली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अत्याचाराच्या घटनांची पोलिसांकडे नोंद होऊ लागली आहे. शासकीय आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात बलात्कार आणि विनयभंगांच्या गुन्ह्यांमध्ये २० टक्के वाढ झालेली दिसते. अधिक माहिती घेतल्यास लक्षात येते की, हे बहुतांश गुन्हे दारूच्या नशेत घडतात. तरुण तेजपाल यांनीसुद्धा नशेतच ‘तहलका’ माजवला होता, हे सर्वश्रृत आहे; पण तरीही महिला अत्याचारांमागील कारणांची चर्चा करताना आपल्या जीवनातील दारूच्या प्रभावाचा उल्लेख होत नाही. तसे पाहायला गेल्यास इंग्रजांच्या कंपनी सरकारने १७५८ मध्ये कलकत्त्यात पहिले विदेशी दारूचे दुकान सुरू केले होते. १९४७ मध्ये ती संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली आणि आता तर साधारणत: २६ हजार दुकानांतून, ‘अधिकृतपणे’ दारू विकली जाते. पण आपला महाराष्ट्र तर इतर राज्यांपेक्षा ‘अधिक महान’ असल्यामुळे आमच्या राज्य सरकारने गल्लोगल्ली बीयर-वाइन विक्रीची दुकाने काढण्यास ‘उत्तेजन’ दिलेले आहे. थोडक्यात काय तर, एकीकडे औषधांची विक्री करणा-या दुकानांवर इतके निर्बंध लादायचे की राज्यातील निम्मी औषध दुकाने बंद होतील.. दुसरीकडे जे ‘औषध’ पोटात गेल्यावर माणसे राक्षस बनतात, आपल्या आया-बहिणींवर अत्याचार करतात, त्या दारूच्या दुकानांना दवा-औषधाच्या दुकानांपेक्षा जास्त मोकळीक देणे, हा शासकीय निर्णय शुद्धीत घेतलेला असेल यावर माझा विश्वास नाही..

Read More …


आपल्या बहुभाषिक, बहुधर्मीय आणि विविधतेने नटलेल्या देशात सगळेच पक्ष राजकारण करताना आम लोकांच्या भाषिक, धार्मिक वा सांस्कृतिक अस्मितांचा वापर करताना दिसतात. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी संसदेत इंग्रजीचा वापर बंद करा, तेथे हिंदीची सक्ती करा, अशी मागणी करणे, हा अशाच भावनिक राजकारणाचा भाग आहे. काही आठवडयांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अशाच प्रकारे हिंदीच्या सक्तीची मागणी करून ‘इंग्रजी हटाओ’चा नारा दिला होता; परंतु मुलायम सिंह असो वा राजनाथ सिंह, या इंग्रजीला विरोध करणा-या नेत्यांच्या घरातील पुढील पिढी अगदी प्राथमिक शाळेपासूनच इंग्रजीत शिकलेली आहे. भाषेबरोबर भोजन आणि वेशभूषेवरही इंग्रजी जीवनपद्धतीचा प्रभाव अंगीकारणारी आपली पुढील पिढी या राजकीय नेत्यांना चालते, खरे सांगायचे तर आवडते; परंतु जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो त्या वेळी त्यांचे राष्ट्रभाषा हिंदीचे प्रेम अचानक उफाळून येते. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेना किंवा राज ठाकरे यांच्या मनसेला आकस्मिक ‘मराठीप्रेमाचा झटका’ येतो, मग अटकेपार झेंडे फडकावणा-या म-हाटयांचे वंशज म्हणविणारे ‘सैनिक’ नेत्याच्या आदेशाने रस्त्यावर उतरतात आणि मग यू.पी. किंवा बिहारी भय्यांचे प्रतीक म्हणून रस्त्यावरील सगळ्यात दुर्बल आणि हतबल टॅक्सीवाल्यांवर ‘अ‍ॅटॅक’ करतात, पळून जातात. सैनिकांच्या या कृतीला ‘खळ्ळ खट्टयाक’ असे विचित्र; परंतु भीतिदायक नाव देऊन नेते आपले ‘राज’कारण दाखवून घेतात, त्यामुळे मुलायम, राजनाथ किंवा राज ठाकरे यांच्या या भाषिक राजकारणाची चर्चा करताना आपल्याला त्याच्या धोकादायक परिणामांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे ठरते.
Read More …


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उच्चवर्णीयांमधून समाजाच्या सर्व थरांत जावा, यासाठी नजीकच्या चार-पाच दशकांत ज्यांनी प्रयत्न केले, त्या मोजक्या नेत्यांमध्ये विलासजी फडणवीस यांचे नाव घेता येईल. उत्तम संघटक, जिद्दीचा प्रचारक आणि प्रेमळ मार्गदर्शक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणा-या विलासजींचे सात नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत बुधवार, २० नोव्हेंबरला केले आहे. कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध असणा-या संघामध्ये राहून आपल्या प्रेमळ आणि मनमोकळ्या स्वभावाने वेगळी ओळख निर्माण करणा-या विलासजींच्या जीवनपटाचा मागोवा घेत संपादक महेश म्हात्रे यांनी वाहिलेली आदरांजली.
Read More …

स्वातंत्र्यपूर्व काळात, मोगली आणि इंग्रजी सत्तेच्या कचाटयात देश सापडण्यापूर्वीपासून म-हाटी समशेरीने आणि अक्कलहुशारीने आपली चमक आणि धमक दाखवली होती. त्यामुळे ‘कोणताही’ पराक्रम करण्याची क्षमता असलेला हा मराठी समाज कायम संभ्रमावस्थेत राहावा, जेणेकरून उद्योग-व्यवसायापासून सत्तासंपादनाच्या महत्कार्यापर्यंत तो पोहोचू नये, यासाठी देशी – विदेशी सगळयाच सत्ताधा-यांनी प्रयत्न केले. हा इतिहास अगदी ताजा आहे; परंतु तरीही इतिहासाची जाण आणि वर्तमानाचे भान हरपून बसलेला हा वर्ग भविष्याच्या चिंतेने बेजान झालेला आहे. मनुष्य असो वा समाज, जेव्हा त्याला स्वसामर्थ्यांचा विसर पडतो, त्या वेळी त्याला अज्ञाननिद्रेतून जागविण्याची गरज असते. सतराव्या शतकात ते काम छत्रपती शिवबा राजांनी, तुकाराम महाराजांनी केले. १९ व्या शतकात लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि अनेक समाजधुरिणांनी महाराष्ट्राला त्याच्या ‘महान’तेची जाणीव करून दिली; पण स्वातंत्र्यानंतर आजतागायत आमचे महान राष्ट्र, प्रगतीच्या मार्गावर चाचपडताना दिसत आहे आणि सगळयात दुर्दैवी घटना म्हणजे, आमच्या या मर्दमराठय़ांना नेतृत्वासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कातडीबचावू राजकारण्याच्या मागे जावेसे वाटू लागले आहे. राज ठाकरे यांच्या ‘मोदी कार्यदर्शन’ सोहळयाने सुरू झालेला हा ‘उलटा प्रवास’ गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, विनोद तावडे, आशीष शेलार आदी मंडळींच्या साथीने आणि साक्षीने आपल्या महाराष्ट्र देशी सुरू झालाय. विशेष म्हणजे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने हा ‘मोदीप्रवाह’ आपल्याकडे वाहतो आहे, वाढतो आहे, त्या संघिष्टांनी सत्तेच्या हव्यासापोटी आपल्याच मराठी समाजाचे पंख छाटण्याचे कारस्थान रचले आहे. ही बाब आपण सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि ते कारस्थान उधळून लावले पाहिजे. आज देशातील सर्व प्रांतांमधील सामाजिक स्थितीचा जेव्हा अभ्यास केला जातो, त्या वेळी आधुनिक शेतीची कास धरणारे पंजाब, पर्यटन आणि शेतीचा समन्वय साधणारी केरळसारखी राज्ये ‘समृद्ध’ जीवन जगताना दिसतात आणि त्या तुलनेत दरडोई उत्पन्नाच्या सरासरीत देशात आघाडीवर असणा-या महाराष्ट्राची बहुतांश जनता मात्र मर्यादित साधनसुविधांवर कशीबशी गुजराण करताना दिसते. हे आमच्या नेतृत्वाचे नाही, तर आमच्या हतबल समाजाचे अपयश आहे.
Read More …


विख्यात कवी पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ कादंबरीमध्ये लच्छी नामक मुलीची खूप मनोवेधक कहाणी सांगितली आहे. लच्छी आणि मोर ही रूपके वापरून पु. शि. आपल्याला सुचवितात की, ‘तुम्हाला मोर पाहिजे असेल तर तुम्ही स्वत:च मोरस्वरूप होऊन गेले पाहिजे.’ सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी त्या लच्छीच्या मोरप्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि ओजस्वी. आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रसिद्धी मिळूनही तो कधी वादग्रस्त ठरताना दिसत नाही. क्रिकेट म्हणजे सत्ता स्पर्धा, वादविवाद; पण त्यात सचिन मात्र कुठेही नाही. एवढेच कशाला जेव्हा अवघे क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंग आणि बेटिंगच्या कृष्णछायेने घेरले असताना ‘आमचा’ सचिन मात्र उजळ माथ्याने बॅटीचा लखलखाट करताना दिसत होता. म्हणून सचिनने क्रिकेटमधून निवृत्त होणे, ही घटना लोकांना नकोशी वाटत होती; पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अगदी ज्याप्रमाणे आपल्या लाडक्या लतादीदी वाढत्या वयोमानामुळे गायच्या थांबल्या, तसा ‘क्रिकेटचा देव’ सचिनही आपले मैदानावरील ‘अवतारकार्य’ संपवून जगण्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज होत आहे. त्याच्या या नव्या खेळीसाठी शुभेच्छा देणारा हा खास विशेषांक ‘प्रहार’ने तुमच्यासमोर आणला आहे. त्यात विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर, माजी यष्टिरक्षक किरण मोरे, नामवंत क्रिकेट पंच माधवराव गोठोस्कर, क्रिकेटपटू अमोल मुजुमदार, सिने-नाटय कलावंत संजय मोने, दिवंगत क्रीडा समीक्षक अभिजीत देसाई यांच्यासह अनेक नामवंतांचे सचिनचे वेगळेपण सांगणारे लेख आहेत.
Read More …

आपल्या देशात निवडणुका जवळ आल्यावर धर्म, प्रादेशिकवाद, महापुरुषांचे नव्याने स्मरण आदी गोष्टींना अक्षरश: ऊत येतो. सगळेच राजकीय पक्ष आणि राजकारणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असणा-या संघटनांना तर नवनवे वादविषय उकरून काढण्याची संधीच हवी असते. यापूर्वी राष्ट्रीय राजकारणात असे वादग्रस्त विषय काढून वातावरण तणावग्रस्त करणारे होतेच; पण त्यांचे राजकीय स्थान नरेंद्र मोदी यांच्याएवढे महत्त्वाचे नव्हते. आणीबाणीच्या काळात नवनवे विषय उकरून काढण्याचे काम राजनारायण करायचे, त्यानंतर डॉ. सुब्रमण्यम् स्वामी, ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनी त्यांची जागा घेतली. नजीकच्या काळात समाजवादी पक्षाचे अमरसिंह यांनी कुरापती काढून कलागती लावण्याची परंपरा सुरू ठेवली होती; पण आज भाजपने ज्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवलेले आहे, ते गुजरातचे ‘यशस्वी’ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने वायफळ बडबड करीत आहेत, ते पाहून त्यांची आणि त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणा-या त्यांच्या ‘थिंक टँक’ची कीव करावीशी वाटते. 

परवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचा शुभारंभ करताना मोदींनी इतिहासाची मोडतोड केली. पंडित नेहरू यांच्याऐवजी वल्लभभाई पंतप्रधान झाले असते, तर आज भारताचे चित्र वेगळे झाले असते, असेही तारे त्यांनी तोडले. वल्लभभाईंच्या या अतिविशाल स्मारकाची मोदी सरकारने देशभरात अतिप्रचंड (खरे तर अतिखर्चिक) जाहिरातबाजी केल्यामुळे मोदींचे भाषण बहुतांश प्रमुख वृत्तवाहिन्यांनी थेट घराघरात पोहोचवले. मोदी जेव्हा सरदार पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते, असे मोठया आवेशात बोलत होते, त्या वेळी जैमिनी पाठक यांच्या अभिनयाने नटलेले ‘महादेवभाई’ हे नाटक प्रकर्षाने आठवले. त्यात गांधीजी आणि सरदार पटेलांमधील एक संवाद खूप बोलका आहे. एकदा गांधीजींनी वल्लभभाईंना थेट विचारले, ‘‘देश स्वतंत्र झाल्यावर आपले जे मंत्रिमंडळ स्थापन होईल, त्यात तुम्हाला कोणते पद हवे?’’ क्षणाचा विलंब न लावता वल्लभभाई उत्तरतात, ‘‘मला काही नको, स्वातंत्र्य मिळाल्यावर मला संन्यासी व्हायची इच्छा आहे. मी एकतारा हाती घेऊन देवाची भजने गात फिरेन. भिक्षेसाठी माझ्या हाती एक कटोरा असला की पुरे. दुसरे मला काही नको?’’ वल्लभभाईंची ही निर्मोही आणि नि:स्वार्थी सेवावृत्ती त्यांच्या ‘लोहपुरुष’ या प्रतिमेपेक्षा खूप लोभस आणि मोहवून टाकणारी आहे. चार जानेवारी १९३२ ते आठ मे १९३३ या काळात गांधीजी आणि वल्लभभाई पुण्याच्या येरवडा तुरुंगात एकत्र होते. त्या वेळी सरदारांचे करारी व्यक्तिमत्त्व अनेकदा प्रकट होई. एका चर्चेदरम्यान महात्माजींना ते तोंडावर म्हणाले होते, ‘‘आजवर वाचन आणि लिखाण करून कोणीही अमर झालेला नाही. जो संघर्ष करतो तोच अजरामर होतो.’’ सरदारांच्या या कणखर आणि प्रखर वर्तणुकीमध्ये आईच्या मायेचा ओलावा होता. त्याबद्दल गांधीजींनी एका पत्रात लिहिले आहे. ‘‘पटेलांच्या सहवासात राहायला मिळणे, ही माझ्या आयुष्यातली सर्वोच्च आनंदाची गोष्ट होती. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि सळसळते राष्ट्रप्रेम मी जाणून होतो; पण सोळा महिन्यांच्या सहवासात मला त्यांच्या हृदयातील ममतेच्या, वात्सल्याच्या पैलूचे अनोखे दर्शन लाभले. त्यांच्यामध्ये आईचे प्रेमळ हृदय असेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती; पण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी असलेले प्रेम आणि सेवाभाव पाहून मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण होत होती.’’

आधी लालकृष्ण अडवाणी यांना ‘नवे लोहपुरुष’ घोषित करून संघ परिवाराने वल्लभभाई पटेल यांच्या विचार-वारशाचे राजकीय अपहरण करण्याचा घाट घातला होता. आता अडवाणी यांना अडगळीत टाकून त्यांनी नवा ‘वाणी’ मोदींच्या रूपात पुढे आणला आहे. मोदींनी तर रा. स्व. संघावर पहिली बंदी आणणा-या सरदार पटेल यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची एकच झिम्मड उडवली आहे.. परंतु त्यांच्या या नव्या नौटंकीने इतिहास थोडीच बदलणार आहे?

दीड हजार वर्षापूर्वीचे प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथे राज्य करणारा सातवाहन राजा बराच हुशार होता. त्याला अनेक राण्या होत्या, त्यातील एकीला चांगले संस्कृत येत होते. ती राजाशी संस्कृतमध्येच संभाषण करी. एकदा राजा सर्व राण्यांसमवेत जलक्रीडा करीत होता. 

जलक्रीडेदरम्यान त्या संस्कृततज्ज्ञ राणीने राजाला विनवले, ‘मोदकै: सिंच’ त्याचा मराठीत अर्थ होतो, ‘अंगावर पाणी उडवू नका’, पण राजाला वाटले, राणीला मोदकांनी आंघोळ करायची आहे. त्याने तत्काळ दासीला हाक मारली आणि ताबडतोब शे-पाचशे मोदक बनवून आणा, असा आदेश दिला. त्याचा तो चमत्कारिक आदेश ऐकून राण्या खळाळून हसल्या आणि त्यांच्या हसण्यामागील कारण समजल्यावर राजाला आपल्या अज्ञानाची शरम वाटली आणि त्याच क्षणी नव्याने अभ्यासाला लागण्याची प्रतिज्ञा घेतली.. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मात्र अजून आपल्या अज्ञानाची शरम वाटल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचे ‘नमो’ या आद्याक्षरांप्रमाणे ‘फेकू’ हे नाव लोकांमध्ये जास्त लोकप्रिय होत चालले आहे.. खोटे बोलावे, पण रेटून बोलावे या रा. स्व. संघपरंपरेवर दृढनिष्ठा असल्यामुळे असेल कदाचित; पण नरेंद्र मोदी हल्ली खूपच खोटे बोलू लागले आहेत. त्यांच्या मते, फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेले प्राचीन तक्षशिला विद्यापीठ बिहारमध्ये आहे.

जगज्जेता सिकंदर, ज्याला प्रत्यक्षात सतलज नदीसुद्धा ओलांडणे शक्य झाले नव्हते, त्याला मोदींनी थेट गंगेच्या काठावर आणून उभे केले. मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याला तर मोदींनी त्याच्या मृत्यूनंतर सुमारे साडेसातशे वर्षानंतर होऊन गेलेल्या गुप्त साम्राज्याचे अधिपती म्हणून घोषित केले.. बरं आता इतिहासाशी एवढे खेळून हा गडी कुठेतरी थांबावा ना, पण नाही. परवा भारताचे पहिले गृहमंत्री, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अगदी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समोर त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाचे प्रदर्शन केले. भारतीय स्वतंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक तथ्यांचे आणि सगळयांना ठाऊक असणा-या सत्याचे दाखले नाकारून मोदी यांनी सरदार पटेल यांना मोठे करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भारतीय विकासाची पायाभरणी करणारी कामगिरी छोटी करण्याचा प्रयत्न केला. ‘देवालये नकोत शौचालये हवीत’ किंवा उत्तर प्रदेशातील उन्नावच्या भोंदूबाबाच्या ‘स्वप्नातील सोन्याची आधी टिंगल मग माफी मागण्याची गोष्ट असो’, मोदी वारंवार तोंडघशी पडत आहेत. त्यांच्या या ‘बोलबच्चन’ शैलीवर लोक हसत आहेत. तरीही मोदी थांबायला तयार नाहीत; कारण ‘अज्ञानात सुख असते’ या सार्वकालिक सत्यवचनावर त्यांचा विश्वास असावा. त्याबद्दलही आपला आक्षेप असण्याचे कारण नाही; परंतु जेव्हा मोदींसारखा नेता आहे तो इतिहास आपल्याला सोयीचा व्हावा, असा प्रयत्न करायला सुरुवात करतो तेव्हा विचार करणा-या लोकांनी जागे होण्याची गरज असते. रा. स्व. संघ आजवर हिटलरच्या एकचालकानुवर्तित्व नेतृत्वपद्धतीचा म्हणजे हुकूमशाहीचा प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे पुरस्कार करीत आला आहे. त्या हिटलरने गोबेल्स या विश्वासू सहका-याला हाताशी धरून आधी जर्मनीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम होऊन जणाचा भूगोल कसा बदलत गेला, हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षातर्फे ज्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, त्या नरेंद्र मोदी यांच्याकडून होणारी इतिहासाची नवी मांडणी धोक्याचा इशारा देणारी आहे. आज मोदी आणि रा. स्व. संघाच्या या सामान्यजनांचा बुद्धिभेद करणा-या कारवायांचे विश्लेषण आणि विच्छेदन करण्याचा फारसा कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. काँग्रेसमधील काही नेते आणि काँग्रेसमधील पदांवर डोळा ठेवून बसलेले काही स्वयंघोषित प्रवक्ते आज ज्या पद्धतीने मोदींना विरोध करीत आहेत, तो अत्यंत वरवरचा आणि तकलादू स्वरूपाचा दिसतो आणि सगळ्यात वाईट बाब म्हणजे मोदींच्या सुनियोजित प्रचारतंत्राच्या वणव्याला विरोध करण्यासाठी जाणा-या या मतलई, खरे तर ‘मतलबी’ वा-यांनी मोदी वणवा विझण्याऐवजी अधिक भडकवण्याचे काम होताना दिसते. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक अनंतमूर्ती असोत, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन असोत वा कवी-विचारवंत जावेद अख्तर असोत, हे विचार करणारे लोक जेव्हा व्यक्त होतात, तेव्हा समाजाला ख-या अर्थाने धीर मिळतो.

भाजपप्रणीत मोदी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचे अतिभव्य स्मारक बनवण्याच्या निमित्ताने भारतीय इतिहासाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करणे, ही काही नवी गोष्ट नाही. गतवर्षीपासून द्रष्टे विचारवंत स्वामी विवेकानंद यांची दीडशेवी जयंती धूमधडाक्यात साजरी करताना संघ परिवाराने विवेकानंदांचा विचार-वारसा वेगळ्या पद्धतीने नव्या पिढीसमोर नेण्याचा प्रयत्न केला. अर्थात, जसे काँग्रेसी विचारपरंपरेचा पुरस्कार करणारे आणि रा. स्व. संघावर पहिली बंदी आणणारे सरदार पटेल यांचे पद्धतशीर ‘अपहरण’ करण्याचा आज प्रयत्न सुरू आहे. अगदी त्याच पद्धतीने विवेकानंद यांच्या पूर्वाश्रमीच्या ‘नरेंद्र’ या नामसाधम्र्याच्या भांडवलावर मोदी यांनी वर्षभर विवेकानंद जयंतीचा अक्षरश: धडाकाच लावला होता; परंतु हे करताना त्यांनी विवेकानंदांचे खरे विचार-कार्य मांडण्याचे टाळले; कारण तसे करणे त्यांना सोयीचे ठरणारे नव्हते. आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने प्रत्येक घटनेची सामाजिक दृष्टिकोनातून चिकित्सा करणारे प्रताप भानू मेहता यांनी संघ परिवाराच्या या कृतीविरोधात लिखाण करताना निधर्मी विवेकानंद खूप छान पद्धतीने मांडले आहेत, ‘‘विवेकानंद यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचा सुयोग्य मिलाफ घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. ‘‘वेदांताचा मेंदू आणि इस्लामचे शरीर हीच माझ्या मातृभूमीच्या विकासाची आशा आहे,’’ असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. येथे स्वामीजींना सगळ्यांना समान मानणारा अद्वैत सिद्धांत ‘प्रॅक्टिकल’मध्ये वापरावासा वाटतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे ‘अद्वैत’ ज्यांच्याशी साकारायचे आहे, त्या इस्लाममध्येसुद्धा समानतेच्या आचरणावर जास्त भर दिला जात असल्याने त्यांच्या या एकूण विचारामागे एकत्वाची कल्पना दिसते.’’ मातृभूमीच्या विकासासाठी विवेकानंदांनी पाहिलेल्या या अभूतपूर्व ऐक्याचे स्वप्न संघ परिवार आणि नरेंद्र मोदी यांना ठाऊक नाही, असे नाही; परंतु इतिहासच बदलायचा जेव्हा निर्णय घेतला जातो, तेथे वस्तुस्थितीचा विपर्यास अनिवार्य ठरतो.

नरेंद्र मोदी यांनी जसा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तद्वत ते इतिहास विसरण्याचाही कसून सराव करताना दिसतात. होय, आज मोदी ज्या पद्धतीने सरदार पटेल यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने देशहिताच्या भावनेचे ‘प्रदर्शन’ करीत आहेत. ते त्यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीच्या निमित्ताने करता आले असते; पण नरेंद्रभाईंना ११ मार्च २०१३ रोजी संपलेल्या या दीडशेव्या जयंती वर्षात युगद्रष्टया सयाजीरावांची साधी आठवणही झाली नाही. मग त्यांचे भव्य स्मारक वा अन्य कार्यक्रम होण्याचा प्रश्नच उद्भवणार कसा?

१९४१मध्ये काँग्रेसमधील सोशालिस्ट मंडळींना बाहेरची वाट दाखवण्याचा घाट घालण्यात गांधीजींचे निकटवर्तीय लोक यशस्वी झाले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते मीनू मसानी यांच्यापाठोपाठ जयप्रकाश नारायण हेसुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडण्यास प्रवृत्त झाले होते. त्या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते युसूफ मेहेरअली यांनी या सगळया प्रकारामागे कोण आहे, यावर गमतीने टिपणी केली होती. ‘राजगोपालाचारी हे गांधीवाद्यांचे मेंदू आहेत, तर वल्लभभाई प्रत्यक्ष काम करणारे, मार्ग दाखवणारे हात आहेत.’ गांधी-नेहरूप्रणीत काँग्रेसच्या नव्या रचनेत ज्यांचा मोलाचा वाटा होता, ते चक्रवर्ती राजगोपालाचारी एका भाषणात म्हणाले होते की, ‘‘हिंदुस्थानात दोनच खरे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव गायकवाड;’’ पण मोदींना आणि त्यांचे ‘बोलविते धनी’ असणा-या संघ परिवारातील मंडळींना सयाजीराव महाराजांची आठवण करणे सोयीचे नाही. त्यांना सरदार पटेलांची वारंवार आठवण येते; कारण गुजरातेतील सर्वार्थाने प्रबळ असणाऱ्या पटेल जातीच्या पाठबळाशिवाय सत्ता टिकवणे अशक्य आहे. गेल्या पन्नास वर्षात चार वेळा राष्ट्रपती राजवटींचा सामना करणा-या गुजरातेत हितेंद्रभाई देसाई यांनी १९६५ ते १९७१ दरम्यान सलग तीनदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यानंतर माधवसिंह सोळंकी यांनी चारदा मुख्यमंत्रीपद मिळवले; परंतु बाबूभाई, केशुभाई आणि चिमणभाई या तीन पटेलांनी आठ वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळवून, गुजरातच्या राजकारणावर पटेलांचा किती पगडा आहे हे दाखवून दिले होते. मोदींनी आपल्या पक्षातील केशुभाई पटेल यांचे प्रभुत्व संपवताना कुटिल नीतीचा वापर तर केलाच; पण त्याचबरोबर काँग्रेसमधील पटेलांना कौशल्याने निष्प्रभही केले. परिणामी गेल्या तीन टर्ममध्ये मोदी यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान मिळाले नाही. ते भविष्यातही मिळू नये आणि आपण गुजरातबाहेर पडलो तरी संपूर्ण राजकारण आपल्या हातात राहावे यासाठी मोदींनी मोठया खुबीने ‘पटेल कार्ड’ वापरणे सुरू केले आहे. सयाजीरावांचे कार्यकर्तृत्व पटेलांच्या तुलनेत कित्येकपट मोठे होते, हे सांगायला मला आज येथे अभिमान वाटतो; पण मोदींच्या वातावरणनिर्मितीच्या भूलभुलैयात अडकलेले आमचे मराठी भाजप वा सेना नेते वस्तुस्थितीकडे डोळेझाक करतात त्या वेळी त्यांच्या असहायतेची दया येते. मोदींच्या सभेत आशाळभुतासारखे बसणारे सेना-भाजपचे नेते मोदींना ‘तुम्ही आमचे सयाजीराव मराठी होते म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले का?’ असा सवाल विचारू शकणार नाहीत, याची मला पूर्ण खात्री आहे; पण मोदींच्या राजकारणावर उठसूट बोलणा-या काँग्रेसच्या अधिकृत वा अनधिकृत प्रवक्त्यांनाही ही बाब खटकली नाही, याचे आश्चर्य वाटते. आमच्या सयाजीराव महाराजांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी अफाट मेहनत घेतली. इंग्रजांचा रोष पत्करून, जीवाची बाजी लावून ते राजकीय स्वातंत्र्यासाठी जेवढे झटले तेवढेच त्यांनी सामाजिक क्रांतीसाठी योगदान दिले आहे. सयाजीरावांनी बडोद्यात राहून लोकमान्य टिळक, ना. गोखले, लाला लजपतराय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यापासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत सर्वाना स्वातंत्र्य संग्रामासाठी स्फूर्ती दिली. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याला खुला पाठिंबा दिला होता, तर डॉ. आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मदत दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन बडोदा संस्थानात अस्पृश्यता बंद केली. त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

स्त्री-शिक्षणासाठी शाळा उघडल्या. गुजराती आणि मराठी भाषेत शालेय शिक्षण असावे, यासाठी खास अभ्यासक्रम तयार केले. या जाणत्या राजाने, ज्याचा जन्म नाशिकजवळच्या कवळाण्यात झाला होता, अत्यंत सामान्य घरात बालपण गेले होते; पण नशिबाने लाभलेल्या राजेपदाला मेहनत, कर्तबगारीने सार्थ करून दाखवले होते. सयाजीराव महाराजांनी आपले बडोदे संस्थान प्रशासनात युरोपीय देशांच्या तोडीचे व्हावे, असा ध्यास घेतला होता. त्यासाठी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पंचायतराजसारखा अभूतपूर्व उपक्रम त्या काळात राबवला. त्यांच्या या लोकाभिमुख प्रशासनाची तेव्हा केवळ भारतातच नव्हे तर युरोप, इंग्लंडातही चर्चा होत होती. त्यामुळे बडोदा नरेशांना जागतिक स्तरावरील कार्यक्रमात सन्मानाने आमंत्रित केले जाई. १८७५ ते १९३९ या सुमारे ६४ वर्षाच्या कालखंडात सयाजीरावांनी राज्य कसे चालवावे, याचा आदर्श जगापुढे उभा केला. राज्यात नैसर्गिक आपत्ती आली तर, दुष्काळाने कहर माजवल्यावर हा ‘लोकांचा राजा’ दुर्गम, दुर्लक्षित भागामध्ये धाव घेई, त्यांच्या राज्यात धार्मिक कर्मठपणाला, जातीय वर्चस्वाला स्थान नव्हते; परंतु प्रत्येक माणसाला चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. ज्ञान घेण्याचा अधिकार आहे, तेथे त्याची जात वा धर्म आडवा येणार नाही, याची सयाजीराव महाराज काळजी घेत असत. त्यांच्या या युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाची झलक त्यांच्या भाषणातून पाहायला मिळते. ‘साकेत प्रकाशन’ने महाराजांच्या भाषणांचे तीन खंड काढले आहेत. पहिल्या खंडात शिक्षण, धर्म व तत्त्वज्ञान, दुसरा आणि तिस-या खंडात राज्य प्रशासन आणि राज्य व्यवहार यासंदर्भात त्यांची मते वाचायला मिळतात. या तिन्ही खंडांना प्रख्यात समीक्षक व विचारवंत डॉ. रमेश वरखेडे यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. प्रस्तावनेत डॉ. वरखेडे लिहितात, ‘कागदी राज्यघटनेपेक्षा कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि सामाजिक पुनर्घटनेवर भर दिला पाहिजे. हा सयाजीरावांचा दृष्टिकोन त्यांच्या भाषणातून आपल्याला कळतो. जनतेला नागरी हक्कांबरोबरच राजकीय सत्तेत सहभाग, धर्ममूल्ये आणि नागरीमूल्ये यांची सांगड, अल्पसंख्याकांचे संरक्षण, शाश्वत विकासासाठी जमीन सुधारणा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या साधनांचा विकास यावर त्यांचा भर होता. विकासाची फळे सर्वसामान्य माणसाला लाभावी याकडे त्यांचा कल होता. राष्ट्राची प्रगती होण्यासाठी कर्तबगार माणसे लागतात या जाणिवेतून सयाजीरावांनी विविध खात्यांतील लोकसेवकांच्या कर्तव्याची संहिता तयार केली व त्यांना राज्य-प्रशासनाचे प्रशिक्षण दिले होते. म्हणून राजकीय प्रयोगांची संपूर्ण माहिती असलेली ही भाषणे लोकप्रशासनाच्या दृष्टीने एखाद्या ‘राज्योपनिषदा’सारखी आहेत. सुप्रशासनासाठी लागणारे बौद्धिक चैतन्य निर्माण करण्याची क्षमता ठासून भरलेली ही भाषणे जागरूक नागरिक, शासकीय अधिकारी, कामगार संघटनांचे नेते आणि राज्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरतील,’ असा विश्वास डॉ. वरखेडे यांनी प्रस्तावनेत व्यक्त केला होता; पण आमचे दुर्दैव असे की, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आयुष्यभर मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणा-या या लोकोत्तर राजाच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हा मराठी लोकांनाच विसर पडलेला दिसतोय, मग मोदींसारख्या गुज्जुभाईकडून आम्ही वेगळ्या वर्तणुकांची काय अपेक्षा करावी?

मोदी आज आपल्या राजकीय स्वार्थासाठी सरदार पटेल यांच्या नावाचा वापर करताहेत. पंतप्रधानपदाच्या आशेच्या झुल्यावर ते इतके दंग झाले आहेत की, आपण झोपाळ्यावर बसलेलो नसून गगनभरा-या मारत आहोत, असा त्यांचा समज झालेला दिसतोय. त्याउलट सर्व संस्थानिकांना ‘सरळ’ करून भारताचे एकीकरण घडविणारे ‘पोलादीपुरुष’ वल्लभभाई यांचे पाय जमिनीवरच होते. एखाद्या शेतक-याला साजेसा असा धोतर, कुर्ता आणि जाकीट असा पेहराव, पायात साध्या चपला आणि बोलण्यात गांधीजींप्रमाणे विनम्रता, हे सरदारांचे गुण घेणे डिझायनर कपडे घालून, मॉडेलप्रमाणे पोझ देणा-या, उर्मट भाषेत बोलणा-या नरेंद्र मोदी यांना जमणे शक्य नाही, पण हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर वल्लभाईंनी फार सुरेख उद्गार काढले होते, त्याचा येथे उल्लेख करावासा वाटतो. प्रसिद्धीच्या शिखरावर आरूढ झालेले वल्लभभाई तेव्हा म्हणाले होते, ‘‘हे जग बुद्धिबळाच्या पटासारखे आहे आणि आपण त्यावरची साधी प्यादी आहोत. त्यानुसार आपण छोटया किंवा मोठया घटनांमध्ये सहभागी होत असतो. या सहभागाबद्दल आपण परमेश्वराचे आभारच मानले पाहिजेत.’’ पटेलांचे हे म्हणणे नरेंद्रभाईंना ‘पटेल’ असे मात्र वाटत नाही.
Read More …


इसवी सन पहिल्या ते पंधराव्या शतकापर्यंत भारत अक्षरश: सुवर्णभूमी म्हणूनच ओळखला जात होता. येथील सुबत्ता आणि संपत्तीच्या सुरस कथांनी युरोपियन जग भारताकडे आकर्षित झाले. मायकल एडवर्ड्स यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात पोर्तुगाल आणि इंग्लंडची पावले आपल्या देशाकडे कशी वळली, याचा सुरेख मागोवा घेतला आहे. एडवर्ड्स लिहितात, पंधराव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधारी पोपच्या आशीर्वादाने अत्यंत प्रभावशाली बनले होते. त्यामुळे इस्लामच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे ही आपली जबाबदारी आहे, अशी त्यांची भावना झाली होती. त्याच भावनेतून भूमध्यसागरीय देशातील इस्लामी सत्ताधा-यांचा भारत आणि चीनच्या व्यापारावर असलेला प्रभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी भारताकडे मोर्चा वळवला होता. त्यामधूनच, १४९८ मध्ये केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को-द-गामा कालिकतच्या किना-यावर पोहोचला. भारतभूमीवर समुद्रमार्गाने झालेले ते पहिलेच आक्रमण होते. तत्पूर्वी सगळी आक्रमणे खबर खिंडीतून झाली होती.. वास्को-द-गामाच्या कालिकतमधील आगमनाची संपूर्ण कहाणी ‘अ जर्नल ऑफ द फर्स्ट व्हायेज ऑफ वास्को-द-गामा’ या पुस्तकात सांगितली आहे. त्यात एका ठिकाणी हा धाडसी दर्यावर्दी उद्गारतो, ‘भारताची ही सफर किती भाग्याची आहे, दोस्तानो, देवाला धन्यवाद द्या. सोने, हिरे, रत्नांनी खच्चून भरलेल्या भूमीत आपण आलो आहोत.’ पोर्तुगीजांसह इंग्लंड, फ्रान्स आदी देशांनी भारताचे ऐश्वर्य अक्षरश: धुवून नेले आणि आपले देश संपन्न बनवले.. संपन्न भारतभूमीत पुन्हा सुवर्णयुग अवतरू शकते, ते काही कठीण नाही. त्यासाठी किमान दोन-चार पिढयांनी स्वत:ला कामात गाडून घेणे गरजेचे आहे. मात्र तसे करण्याऐवजी शोभन सरकार नावाच्या एका साधुबाबाच्या स्वप्नावर विश्वास ठेवून आमचे सरकार गुप्तधनाच्या शोधात निघाले आहे.. त्यामुळे आमच्या सरकारची जगभरात शोभा झाली, हे मात्र खरे! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातलं सोनं’ ही कथा एकेकाळी प्रचंड गाजली, आता हे ‘स्वप्नातलं सोनं’ गाजत आहे.
Read More …

बाळासाहेबांच्या अनुपस्थितीतील पहिल्याच दस-या मेळाव्यात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित होऊन मनोहरपंतांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले. 
Read More …

कुणाला गावातील आपुलकीची हवा आवडलेली, तर कुणाच्या डोळ्यात गावची आभाळस्वप्ने दडलेली.. त्यामुळे अत्यंत निकड असल्याशिवाय कुणी गाव सोडत नाही आणि परिस्थितीच्या रेटयाने जरी त्या माणसाने गाव सोडले, तरी आठवणींच्या हातांनी त्याला जखडलेला गाव त्याची पाठ सोडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशाच गावप्रेमाने भारलेल्या १०१ मान्यवर मराठी ‘प्रतिभावंतां’नी ‘प्रहार’च्या ‘वाडीवस्ती’ या लेखमालेत आपल्या गावाच्या आठवणी जिवंत केल्या. त्या आठवणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्र, भारत आणि देशोदेशीच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचावा, या हेतूने ‘राणे प्रकाशना’च्या वतीने ‘वाडी-वस्ती’च्या ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांच्याहस्ते, उद्योगमंत्री नारायण राणे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत ‘प्रहार’च्या पाचव्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून बुधवार, दि. तीन ऑक्टोबर २०१३ रोजी झाले. त्या ‘वाडीवस्ती’ची ही प्रस्तावना..

Read More …

जगभरातील सोळा शहरांमध्ये घेण्यात आलेल्या प्रामाणिकपणाच्या चाचणीत आपल्या मुंबईने दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबईवर प्रेम करणा-या सर्वच लोकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. एरवी नको त्या गुन्हयांसाठी चर्चेत असणा-या मुंबईच्या या प्रामाणिकपणाचा प्रत्यय अनेकदा रिक्षा-टॅक्सी चालवणा-यांच्या वस्तू, पैसे, सोने परत करण्याच्या कृतीतून येत असतो. मुंबईकरांचा हा चांगुलपणा आणि कोणत्याही स्थितीत तडजोड करण्याची सहनशील वृत्ती अन्यत्र पाहायला मिळत नाही; कारण मुंबईचे चारित्र्य येथील उदार, दानशूर आणि समाजहितैषी श्रीमंतांच्या कार्यातून घडले आहे. या लक्ष्मीवंतांनी मुंबईकरांना आरोग्य, विद्या, संपन्नता आणि राजकीय सामर्थ्य लाभावे यासाठी आपला पैसा खर्च केला.. एकेकाळी सात बेटांची असणारी मुंबई आज सात शेठांची झालेली आहे.. तिच्या जीवावर उडया मारणा-या या धनिकांनी मुंबईच्या सव्वा कोटी लेकरांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ही मुंबा-आई जेवढी धनिकांना प्रिय तेवढीच तुम्हा-आम्हा सगळ्यांचीच आवडती आहे..



Read More …

जगातील सगळयाच देशांमध्ये राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, अपवाद फक्त भारताचा. आपला देश स्वतंत्र होईपर्यंत लक्षावधी लोकांनी प्राणत्याग – स्वार्थत्याग करून लढा दिला. मध्यमवर्ग या सगळ्या लढाईत पुढे होता. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत भारतीय समाजमनाला दिशा दाखवण्यासाठी लेखक, विचारवंत, संपादक, प्राध्यापक, डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी भरलेला मध्यमवर्ग पुढे असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र प्रत्येक पांढरपेशा माणूस स्वतंत्रपणे वागू लागला. देशापेक्षा स्वहितासाठी राबू लागला. देशाला काही देण्यापेक्षा स्वत:साठी सर्व मागू लागला. परिणामी देशाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. वाईट स्थितीत कर्ता-कमावता मुलगा घर सोडून जावा, तद्वत १९६० पासून आमच्या देशातील बुद्धिमंत – प्रज्ञावंत वर्ग युरोप-अमेरिकेत जाऊन त्यांच्या सेवेत रमला आणि एन.आर.आय. (अनिवासी भारतीय) झाला. आजही त्या परिस्थितीत बदल झालेला नाही. भारतातील प्रतिष्ठेपेक्षा तिकडे मिळणा-या डॉलर्सपुढे लाचार झालेला हा वर्ग अपमानाला सरावला आहे. म्हणून त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे, ‘देश तुम्हाला काय देतो, यापेक्षा तुम्ही देशाला काय देता हे महत्त्वाचे’ हे सुप्रसिद्ध वाक्य लक्षात राहत नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्या डोळयांसमोर असणारे लंडनच्या ट्रॅफलगार चौकातील ‘ब्रिटन एक्सपेक्टस् एव्हरीबडी टू डू हिज डयुटी’ (प्रत्येकाने आपले कर्तव्य – कर्म चोख बजावले पाहिजे, ही ब्रिटनची अपेक्षा आहे) हे वाक्यही दिसत नाही. स्वार्थामुळे आई – बापांची पर्वा नसते, मग त्यांच्याकडून भारतमातेने काय अपेक्षा करावी? चीनच्या एकूण आर्थिक प्रगतीत विदेशात राहणा-या चिनी उद्योजकांचे मोलाचे योगदान आहे. त्या तुलनेत आमचे अनिवासी भारतीय खूपच अनास्था दाखवतात, असे का?
Read More …

गणपती, म्हणजे गणांचा, लोकांचा नेता. हा लोकनायक ‘सकळविद्यांचा अधिपती’ आहे. ज्ञानी असला, पराक्रमी असला तरी विनम्र आहे. तो लोकांना तापदायक ठरणा-या असुरांचा नायनाट करतो, म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. त्याचे दर्शन, मार्गदर्शन सगळ्या लोकांना सुखदायी असायचे म्हणून तो सुखकर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो. मनासारख्या चंचल असणा-या उंदराला त्याने आपले वाहन केल्यामुळे तो ‘मूषकवाहन’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या अवाढव्य शरीरामुळे त्याला ‘तुंदिलतनू’ म्हणतात, पण तसे असूनही तो छान नर्तन करू शकतो, हे त्याचे वैशिष्टय. त्याला गोड आवडते. मोद म्हणजे आनंद, आनंददायी मोदक तर गणपतीची ओळख बनली आहे, त्यामुळे जेव्हा घरोघरी गणपती येतात तेव्हा मोदकाच्या प्रतीकातून आनंदही घराघरात पसरतो. गजमुख, गणेश हा बुद्धिमत्ता, विद्या आणि समंजसपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे, पण तो त्याचा फक्त लोकरक्षणासाठी वापर करतो, त्याच्याकडे बुद्धी आहे, पण ती त्याने व्यासांकडे ‘महाभारत’ लिहिण्यासाठी वापरली. असा हा अवघ्या मराठी मनांना मोहवणारा लेखक गणेश विलक्षण हुशार आहे, म्हणून रिद्धी-सिद्धी त्याच्या शेजारी उभ्या असतात. आजवर बौद्धिक क्षेत्रात देशाला मार्गदर्शन करणा-या मराठी लोकांनी गणपतीचा हा गुण ओळखला होता, पण आता मात्र कुणालाच विद्येची आराधना करण्यास, विज्ञानाची साधना करण्यास वेळ नाही. सर्वाना हवाय रिद्धी-सिद्धींच्या माध्यमातून मिळणारा सुखोपभोग.. तसे शक्य नाही. देवासमोर रांगा लावून यश आणि सुख मिळायला, देवकृपा म्हणजे रेशनिंगचे धान्य आहे का?

Read More …

प्रत्येक देशाची ‘मुद्रा’ हा त्या देशाचा ‘चेहरा’ असतो. भारतीय मुद्रेचं डॉलरच्या तुलनेतलं पतन ही वित्तीय क्षितीजावरची अतिशय गंभीर बाब असली तरी या समस्येचा मुद्राराक्षस नियंत्रणाखाली आणण्यासाठी वित्तक्षेत्रातील तज्ज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांच्या ओझ्यामुळेच या मुद्रापतनाला आणि शेअर बाजारातील हिंदोळ्यांना चालना मिळते आहे, असा लोककल्याणाविरोधी धक्कादायक प्रचार माध्यमांमधून सुरू आहे. रुपया जसा गोल असतो, तशीच भाकरीही गोलच. गरिबांच्या उपाशी पोटात भाकारीचा घास जावा यासाठी आपले केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गोल रुपयाचा तोल जातोय, तसा काही नफेबाज कथित विचारवंतांचा तोलही ढळू लागलाय. मुद्रासमस्येच्या परिस्थितीआडून आकडयांचा बादरायण संबंध लावत लोककल्याणाच्या कार्यक्रमांनाच दोषी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण खेळले जात आहे. पण इतिहास साक्षी आहे की इथल्या श्रमिक शक्तीनेच अर्थकारणाचा गाडा आपल्या खांद्यावर घेऊन वित्तकारणाला सकारात्मक दिशा दिली आहे. आता हा इतिहास पुन्हा घडवायची वेळ आली आहे!
Read More …

डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमी होत आलेली किंमत, हा सध्या सर्वच भारतीयांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक स्तरावर झालेल्या आर्थिक उलाढालींमुळे रुपया घसरला हे मान्य. परंतु १९४७ साली डॉलरच्या बरोबरीने असलेला रुपया जेव्हा स्वातंत्र्याला सहा दशके उलटल्यानंतर एक डॉलरला साठ रुपये होतो, तेव्हा आमच्या आर्थिक नियोजनाचे अपयश ठळकपणे समोर येते. भारतात मोगल राजे राज्य करत होते, तेव्हाही अशी स्थिती नव्हती. रे. टेरी नामक युरोपियन प्रवासी १६१५ ते १६१८ या दरम्यान भारतात फिरत होता. निरनिराळया राज्यांत फिरणा-या या चाणाक्ष माणसाने तत्कालीन भारताबद्दल लिहिले आहे की, ‘या देशात पैसा येण्याची अनेक द्वारे सतत वाहत असून येथील पैसा बाहेर नेणे, हा मोठा गुन्हा समजला जातो. हिंदुस्थानात व ब्रह्मदेशात त्या वेळी या गुन्ह्याबद्दल सक्तीचे कायदे होते.’ आपण सध्याची स्थिती पाहिली तर आमच्या लोकनियुक्त लोकशाहीत मोगल बादशहांच्या काळाच्या बरोबर उलट स्थिती आहे. देशातील पैसा अनंत वाटांनी बाहेर जातोय. त्या काळया पैशाच्या ग्रहणातून ज्या दिवशी भारतीय अर्थव्यवस्था बाहेर येईल, त्या वेळी ‘रुपया’ला चांदीची झळाळी पुन्हा प्राप्त होईल.
Read More …

बुद्धगयेतील बोधीवृक्ष आणि वज्रासन यांना बौद्ध धर्मात खूप महत्त्व आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी वैशाख पौर्णिमेला बुद्धगयेत लाखो लोक दर्शनासाठी गोळा झाले होते. साधारणत: त्याच सुमारास आपल्या केंद्रिय गुप्तचर विभागाने बुद्धगयेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्धधर्मीय आणि मुस्लिमांमधील संघर्षाची पार्श्वभूमी या स्फोटांना असल्याचे बोलले जात आहे. जिथे बुद्धवंदना व्हायची, तिथेच हिंसाचारी स्फोट घडवले गेले. या पार्श्वभूमीवर तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रज्ञा-शिल व करुणेच्या उपदेशाची आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची आजही किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.
Read More …

भारत स्वतंत्र झाला, त्या वेळी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते, ‘विकासाच्या वाटेवर शेती उद्योगाने मागे पडून चालणार नाही.’ १९४८ मध्ये महात्मा गांधी यांनी ‘गरिबांच्या भाकरीतच भगवान आहे,’ असे गर्जून सांगितले होते. पंडितजींच्या नंतर पंतप्रधानपदी आलेल्या लालबहादूर शास्त्री यांनी आठवडयातून एक वेळ उपवास करून, गरिबांबद्दल वाटणारी सहानुभूती कृतीने व्यक्त केली होती. या महानायकांच्या आदर्शानुसार इंदिरा गांधी यांनी देशाला भूकमुक्त करण्याचा ध्यास घेतला. नंतरच्या काळात हरित क्रांतीने समस्त देशाला समृद्धीचे स्वप्न दाखवले. दुर्दैवाने कोटयवधी गरिबांना या विकासमार्गाने चकवा दिला. ते अज्ञान, दारिद्रय, उपासमार आणि भूकबळींच्या चौफेर गर्तेत फिरत राहिले. आता स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतर का होईना, सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने ग्रामीण भारतातील ७५ टक्के आणि शहरी क्षेत्रातील ५० टक्के गोरगरिबांना ‘अन्न सुरक्षा’ देण्याचा निर्णय झाला आहे.. हिंदुत्ववादी राजकारण दुर्दैवाने मंदिरातल्या मूर्तिभोवतीच फिरते. पण भाकरीतील भगवानाला, जो आजवर श्रीमंतांच्या चिरेबंदी वाडयात बंदिस्त होता त्याला, गरिबाच्या झोपडीत नेण्याचा हा निर्णय, भारताच्या भविष्याला कलाटणी देणारा ठरेल!

Read More …


भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व आहे. आमचे तुकाराम महाराज तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे म्हणतात. नदीला ‘गंगा मैया’, तर जमिनीला ‘धरती माता’ मानणारे भारतीय दूध देणाऱ्या गायीलाही देवत्व देतात; परंतु प्रत्यक्षात आमच्या देशातील प्रत्येक नदी प्रदूषित झालेली दिसते. जगातील कोणत्याच देशात होत नसेल एवढी जमिनीची प्रचंड धूप फक्त भारतातच होते. एवढेच नाही तर आम्ही आमच्या हवेलाही प्रदूषित करून टाकलेले आहे. गेल्याच आठवडयात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सिन आणि जर्मनीच्या कोलोन गावाजवळून जाणारी -हाईन या दोन्ही नद्यांच्या स्वच्छ आणि सुंदर पात्रांतून सुमारे ५० ते ६० किलोमीटर प्रवास करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण जलप्रवासात नदीच्या पात्रात एकही प्लॅस्टिकची पिशवी वा इतर कुठलाही कचरा वा निर्माल्य पाहायला मिळाले नाही. दोन्ही नद्यांच्या काठांवर छान झाडी, उद्याने, मनोरंजन केंद्रे आणि काही अंतरावर हॉटेल्स पाहायला मिळत होती. कुठे एखाद् दुसरा माणूस निवांतपणे मासेमारी करताना दिसायचा. नद्यांमधून फिरणा-या बोटी-जहाजांमधून पाण्यात काहीही खाली पडणार नाही, याची सगळेच जण दक्षता घेत होते. पर्यावरणरक्षणाची एवढी काळजी घेणारा हा युरोपियन समाज नदी, पर्वत वा धरती मातेला देवत्व न देता हे जपतो आणि आम्ही भारतीय नदी-धरती-झाडे अशा सगळ्याच निसर्ग प्रतीकांचा अमानुष विध्वंस करताना त्यांची पूजा करण्याचा आव आणतो. हा विरोधाभास फक्त युरोपच नाही, तर सगळ्याच प्रगत देशांत फिरताना दिसतो.. उत्तराखंडाची ही आपत्ती निसर्गाच्या रौद्रतांडवातून आलेली दिसत असली तरी तिचा उगम मानवी चुकांच्या डोंगरातून झालेला आहे, हे आपण मान्य केलेच पाहिजे.
Read More …

पर्यटन हा आजकाल अत्यंत किफायतशीर आणि अनेकांच्या हाताला काम मिळवून देणारा व्यवसाय बनत चालला आहे. निव्वळ पर्यटनावर राज्यातील किंवा देशातील लोक चांगले जीवन जगू शकतात, याचे उदाहरण स्वित्झर्लंडलडने जगासमोर सादर केले. त्यापाठोपाठ छोटया-छोटया देशांनीही आपल्याकडील चांगल्या गोष्टींचे योग्य ‘मार्केटिंग’ करून जगातील जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्याचा गेल्या तीन-चार दशकांत जणू चंगच बांधला. त्यामुळे सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया आदी राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुधारली, तर इजिप्त, तुर्कस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांतील अर्थकारणाला ब-यापैकी आधार लाभला. आपल्याकडे  केरळने पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती कशी करावी, याचे उदाहरणच सगळ्यांपुढे ठेवले आहे. काश्मीरने तर दहशवादाच्या वणव्यातही पर्यटनाचे रक्षण आणि संगोपन केले. राजस्थान हा परदेशी पर्यटकांसाठीचा आवडता प्रांत, पण त्या तुलनेत महाराष्ट्रात ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि कोणत्याही पर्यटकाला आवडतील अशी डझनावारी ठिकाणे आहेत; परंतु कोकण वगळता महाराष्ट्राच्या कोणत्याही क्षेत्राने पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत, त्यामुळे परदेशात विशेषत: पॅरिससारख्या जगातील सगळ्यात जास्त पर्यटकांना आकर्षित करून घेणा-या शहरात गेल्यानंतर आपल्याकडे स्वच्छता, सौंदर्य, सुविधा आणि सहकार्याकडे बघण्याची दृष्टीच नसल्याचे लक्षात येते. निसर्गाने सौंदर्याची भरभरून उधळण केली असतानाही लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे या परमेश्वरी देणगीचा उपयोग करून घेतला जात नाही. सुजाण आणि सजग लोकांनी हे कुठेतरी थांबवले पाहिजे.

Read More …

ग्लोबल एडिटर्स नेटवर्क परिषदेत पत्रकारितेशी संबंधित अनेक नवनवीन संकल्पनांवर व्यापक आणि रंजक विचारमंथन होत आहे.
Read More …

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ परिषदेमध्ये गुरुवारी ‘डेटा जर्नलिझम अ‍ॅवॉर्ड’ या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली. झपाटयाने विस्तारत चाललेल्या पत्रकारिता क्षेत्रात अचूकता आणि प्रावीण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आकडेवारीच्या आधाराने होणा-या पत्रकारितेबद्दल दिले जाणारे अशा प्रकारचे हे एकमेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.
Read More …

हल्ली शोधपत्रकारिता बहुतेक संघटनांमधून लोप पावत चालली आहे. काही मोजके शिलेदार मात्र या क्षेत्रात अजूनही किल्ला लढवत आहेत. अशीच एक संघटना म्हणजे अमेरिकेतली ‘प्रोपब्लिका’.
Read More …


ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधन संचालक रॉबर्ट पिकार्ड यांनी ड्रोन पत्रकारितेचे विविध कंगोरे उलगडून दाखवले.

Read More …

फ्रान्सच्या राजधानीत उतरल्यानंतर पहिल्यांदा भावली ती येथील आल्हाददायक हवा. ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ या संघटनेतर्फे आयोजित तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रमांची परिषद बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी गेले दोन दिवस पॅरिसनगरीत उतरत असलेल्या प्रतिनिधींसाठी जणू उत्तम वातावरणनिर्मितीच झालेली दिसते! येथील हॉटेल दा व्हिल येथे तीन दिवस ही परिषद होत आहे. ही वास्तू म्हणजे पॅरिसची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. अगदी सन १३५७ पासून ही इमारत या प्राचीन नगरीचे राजकीय आणि सामाजिक केंद्र बनून गेलेय.

Read More …

मध्यंतरी आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या विविध एफ. एम. चॅनेल्सवर एक काव्यात्म जाहिरात प्रसारित केली जायची. ‘शुभवाणी, लाभवाणी, आकाशवाणी’ कोणत्याही व्यावसायिकाला आवडेल अशी ‘शुभ-लाभ’ या व्यापारी वर्गाच्या आवडत्या प्रतीकांची गुंफण करून ती जाहिरात केली गेली होती.. परवा लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीनामा नाटयाच्या सुमारास ती जाहिरात पुन्हा आठवली. संघ परिवार व भाजपमध्ये असलेल्या व्यापारी वृत्तीच्या नेतृत्वाने ‘ना शुभवाणी, ना लाभवाणी, अडवाणी’ अशी भूमिका घेतल्याने ‘लोहपुरुष’ अडवाणी ‘मोहपुरुष’ बनले आहेत. तर नरेंद्र मोदींना राष्ट्रीय प्रचारप्रमुखपद मिळाल्याने सगळ्याच भाजप नेत्यांना ‘नमो नम:’चा मंत्र जपण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
Read More …

मराठी भाषा म्हणजे काय, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझे उत्तर असेल.. मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार. मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी संताजी-धनाजीची स्फूर्ती, मराठी सावरकरांची कीर्ती, मराठी महन्मंगल मूर्ती शारदेची.
Read More …

‘अ‍ॅग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया’ म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे, असे म्हटले जाते. पूर्वी ती वस्तुस्थिती होती. आता ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असणारी ग्रामस्वराज्याची व्यवस्था मोडून काढली होती. तरीही ‘उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ असेच मानले जात असे. आज २१ व्या शतकात, ‘उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती’ अशी स्थिती झाली आहे, कारण आमच्या कृषिआधारित लोकजीवनाला शेतीचे अर्थकारण सांभाळता आले नाही. परिणामी दिवसेंदिवस शेती आणि शेतकरी यांची स्थिती दयनीय होत चाललीय. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. ‘अन्नदाता’ बळीराजा शेती कसतो, म्हणून आम जनतेचे जगणे सुलभ होते; पण अस्मानी- सुलतानीच्या टाचेखाली हा बळीराजाच जर बळी गेला तर शेतीची माती होईल.. मग उंच टॉवरमध्ये, आलिशान बंगल्यात बसून तुम्ही काय खाणार?


Read More …

इंटरनेट ही आज आपल्याला नवी नसलेली संकल्पना फक्त २० वर्षापूर्वीच लोकांसाठी खुली झाली. ३० एप्रिल १९९३ रोजी अधिकृतपणे ‘वर्ल्ड वाइड वेब’ अर्थात माहितीचे महाजाल लोकांसाठी खुले झाले. सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचा अधिकारी बनवणारी ही घटना जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. अग्नी, चाक, छपाईयंत्र आणि आता इंटरनेट या शोधांनी मानवी जीवनाला, वर्तनाला आणि एकूण लोकव्यवहाराला वेगळी दिशा दिली. ‘विचार’ हे या सगळया शोधांचे मुख्य कारण आहे. म्हणून छापखाना वा इंटरनेट हे वैचारिक क्रांतीचे उगमस्थळ आहेत. अवघ्या २० वर्षात इंटरनेटने जगातील एक तृतीयांश लोकांना प्रभावित केले आहे. पुढील २० वर्षात ते जगाच्या सीमा ओलांडून बाहेर गेले असेल. टी-२० क्रिकेट स्पर्धेत रमलेल्यांनी जरा या विचारविश्वातही डोकावून पाहावे...

Read More …

भारत स्वतंत्र झाला त्या वेळी आनंदित झालेल्या करोडो भारतीयांचा आत्मस्वर बनून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा नियतीशी करार आहे’, असे उद्गार काढले होते. भारताला प्रगतिपथावर नेण्याचा तो निर्धार आजही कायम असला, तरी त्यामागील सर्वागीण प्रगतीचा उद्देश फसला आहे. त्यामुळे आमचे नेते भलेही भारताला अमेरिका, मुंबईला शांघाय किंवा सिंगापूर वा अन्य काही करायचे म्हणत असतील; पण आम्ही तसे काही होण्याआधी जगात महिलांवरील अत्याचारासाठी प्रसिद्ध असलेल्या पापुआ न्यू गिनी या देशासारखेच ‘महिलांच्या वास्तव्यासाठी धोकादायक स्थान’ बनत चाललो आहोत..
Read More …

‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ या म्हणीची वारंवार आठवण यावी, अशी मारामारी सध्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सुरू आहे. भाजपमधील लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांसह किमान अर्धा डझन नेते पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, तर दुसरीकडे ‘डॅशिंग’ नरेंद्र मोदी आपणच पंतप्रधानपदासाठी कसे योग्य आहोत, याचा प्रचारही करायला लागलेले दिसतात. बड्या उद्योगसमूहांचे सर्वेसर्वा, विविध औद्योगिक संघटना आणि प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने ‘नमो’ अर्थात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदासाठी अक्षरश: रान उठवले आहे. गुजरातेत सलग तीन वेळा सत्तासंपादन करणा-या नरेंद्रभाईंनी अगदी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार जशी पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करतात, तशीच ‘फिल्डिंग’ लावली आहे. २००२च्या गुजरातमधील जातीय दंगलींचे भूत पुन्हा मानगुटीवर बसू नये यासाठी सर्वधर्मसमभाव किंवा दलित-आदिवासींचे मूलभूत प्रश्न यासंदर्भात अवाक्षर न काढता मोदींनी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात नवनव्या भूलथापांचे भ्रमजाल निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ या भाजपच्या मूळ नीतीला धरून मोदी वारंवार  चुकीचे संदर्भ आणि फसवे दावे कसे सादर करतात, यावर ज्येष्ठ संपादक किंग शुक नाग यांनी लिहिलेल्या ‘द नमो स्टोरी : अ पोलिटिकल लाइफ’ या पुस्तकात चांगलाच प्रकाशझोत टाकलेला आहे, परंतु तरीही मोदी आपली खोटे बोलण्याची सवय सोडायला तयार नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर त्यांच्या या सवयीवर जाहीर टीका केली. शिवाय मोदी यांना ‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’ ठरवले तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची धमकीही दिलेली आहे. शिवसेनेनेही आता कधी नव्हे ते तोंड उघडले आहे आणि मोदीविरोधाची पुडी सोडून दिली आहे. थोडक्यात सांगायचे तर पक्षातून, पक्षाबाहेरून सगळीकडून विरोध होत असताना नरेंद्र मोदी आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करताहेत. पण पुढील वर्षात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपच्याच गोटातून ‘मोदींना मोडीत काढण्याची’ तयारी सुरू आहे.. त्यांचा निकाल लवकरच लागेल!
Read More …

‘विद्येविना मति गेली’ असे सांगत ‘वित्ताविना शुद्र खचले’ आणि हे ‘इतके अनर्थ एका अविद्येने केले’ अशी जाणीव-जागृती करणा-या महात्मा फुले यांना गुरू मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय दास्यात अडकलेल्या अज्ञानी दलितांना ‘ज्ञानमार्गी’ केले होते. म्हणून भारतात सामाजिक स्थित्यंतराच्या चक्राला गती लाभली. महात्मा गांधी यांनी याच विषयासंदर्भात खूप समर्पक विवेचन केले होते. महात्माजी म्हणतात, ‘‘माणसे शिकू शकत नाहीत, कारण ती दरिद्री आहेत. आणि माणसे संपत्तीवान बनू शकत नाहीत, कारण ती शिकलेली नाहीत, असे एक चक्र आहे. या चक्रात एखाद्याने गरीब असणे, दरिद्री असणे, हा तुम्ही त्याचा गुन्हा ठरवता आहात. ज्या समाजात सधन असणे ही सार्वत्रिक परिस्थिती नाही, तो सामान्य नियम नाही. त्या समाजात गरीब असणे हा गुन्हा ठरू नये.’’ महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू आदी सगळ्याच महान नेत्यांनी, विचारवंतांनी या देशातील गोरगरिबांना प्रगतिपथावर नेण्याची, विकासाची समान संधी देण्याची स्वप्ने पाहिली; परंतु हल्लीच्या काळात उपमुख्यमंत्रीपद भूषविणारे अजित पवारांसारखे राजकारणी जेव्हा गरिबांच्या दारिद्रय, दु:ख, वेदनांची अत्यंत अर्वाच्य भाषेत टिंगल करतात आणि विरोधासाठी विरोध करणारे शिवसेना आणि मनसेचे नेते-कार्यकर्तेही अत्यंत खालच्या पातळीवर जातात, तेव्हा आमच्या सामाजिक न्यायाची आशा दाखवणा-या लोकशाही राज्यव्यवस्थेचे विकृत स्वरूप लक्षात येते आणि मनात प्रश्न थैमान घालू लागतो.. या कोटयवधी भारतीयांच्या दारिद्रय़ाचे करावे तरी काय?
Read More …

आपल्या देशात टोकाचे दारिद्रय आणि ‘अँटिलिया’च्या उंचीची श्रीमंती आहे. त्यामुळे जगातील पहिल्या दहा धनाढयांमध्ये जशी भारतीय नावे आहेत, तद्वत विश्वातील सर्वात जास्त दरिद्री – भुकेकंगाल आपल्याच देशात आढळतात. हा विरोधाभास सर्वच क्षेत्रांत ठळकपणे प्रकट करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. सिनेमा आणि दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांवर जसे चकचकीत – चमचमीत कार्यक्रम पाहण्यास मिळतात, तद्वत क्रिकेटसारख्या खेळाला झटपट मनोरंजनाचे माध्यम बनविण्यात आले आहे. लोकांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यापेक्षा त्यांचे मनोरंजन करण्याला सगळीच माध्यमे प्राधान्य देऊ लागली आहेत. त्यामुळे आज ‘इंडियन प्रीमियर लीग’चा जो मनोरंजनाचा ‘शो’ सुरू झालाय, तो दिसायला आकर्षक असला तरी ‘घुणाक्षर-न्याय’ आहे.. संस्कृत साहित्यात हा ‘घुणाक्षर-न्याय’ प्रसिद्ध आहे. ‘घुणाक्षर’ या शब्दांत ‘घुण’ आणि ‘अक्षर’ हे दोन शब्द आहेत. ‘घुं’ आवाज करणारा भुंग्यासारखा एक प्रकारचा किडा असतो, जो लाकूड पोखरतो. पोखरता पोखरता छिद्राला असा काही आकार मिळतो की, ते एखादे अक्षरच वाटावे. त्या किडयाने अक्षर गिरवण्यासाठी काही लाकूड पोखरलेले नसते; परंतु अनायासे त्यातून अक्षर निर्माण झालेले असते. म्हणूनच अचानक किंवा अकल्पित काही ‘कलात्मक’ घडले, तर ते घुणाक्षर-न्यायाने घडले असे म्हणतात.. पैसे कमावण्यासाठी निर्माण झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या टी-२० सामन्यांच्या झगमगाटाने आज जगाचे डोळे दीपले आहेत; परंतु कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारख्या मान्यवरांनी या ‘आयपीएल’एवढेच ‘बीपीएल’ म्हणजे दारिद्रयरेषेखालील लोकांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे; परंतु तसे न होता, ‘आयपीएल’ जनतेच्याच पैशावर डल्ला मारताना दिसते. हे सगळे आता थांबवलेच पाहिजे.
Read More …

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दलितमुक्तीच्या प्रयोगांनी शतकानुशतके दु:ख-दारिद्रयाच्या खाईत पडलेला मागासवर्गीय समाज माणसात आला. समाज परिवर्तनाच्या या लढाईमुळे भारतातील उपेक्षित वर्गाला आत्मभान मिळाले, हे अवघे जग जाणते. त्यामुळेच असेल कदाचित डॉ. आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच देवदुर्लभ लोकप्रियता लाभली. ती आजही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या आंबेडकरी चळवळीशी संबंधित विचारवंताने केवळ मार्क्‍सवादी क्रांतीचे समर्थन करण्यासाठी ‘डॉ. आंबेडकर यांच्या दलितमुक्तीच्या प्रयत्नांना अपयश आले,’ असे म्हणणे धक्कादायक आहे.
Read More …

महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि समंजस लोकनेत्यांची परंपरा आहे. थोर विचारवंत असलेले बाळासाहेब भारदे हे त्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे नाव. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे सभापती झालेल्या भारदेबुवांनी ‘विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनताजनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता! प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक!’ या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या; परंतु गेल्या आठवडय़ात विधिमंडळात झालेल्या आमदार-फौजदार हाणामारीने विधानसभेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे. ज्या घटनेने या सा-या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली, ती घटना तशी पाहिली तर क्षुल्लक. त्यात गाडी वेगाने नेणारा आमदारांचा वाहनचालक जेवढा दोषी, तेवढाच आमदारांना अरे-तुरे करणारा फौजदारही दोषी ठरतो. परंतु या एका घटनेने राज्यात ‘खाकी विरुद्ध खादी’ पोलिस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा वाद निर्माण केला आहे.. ‘लोकशाही म्हणजे शांततामय मार्गाने समाज परिवर्तनाची प्रक्रिया. शांततेच्या नावाखाली स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली अशांततेला उत्तेजन मिळू नये. हा समतोल साधण्यासाठी संसदीय परंपरेची जपणूक सर्वानीच कटाक्षाने केली पाहिजे’, असे बाळासाहेब भारदे यांचे सांगणे होते. आमच्या राज्यातील फक्त खाकी-खादीधारी मंडळींनी नाही, तर प्रसारमाध्यमांतील सर्व जबाबदार लोकांनीही ही जबाबदारीची जाणीव प्राणपणाने जपली पाहिजे.
Read More …

महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी स्वातंत्र्यचळवळ चालवता चालवता भारतातील मागासलेल्या आणि पिढयान्पिढया दारिद्रयाच्या खाईत खितपत पडलेल्या उपेक्षितांचे अंतरंग जाणले आणि त्यांना माणसांत आणण्याचे प्रयत्न केले. ठक्करबाप्पा, महर्षी कर्वे, ताराबाई मोडक, आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी अशा एकाहून एक महान त्यागी लोकांची शांततामय सेनाच जणू दारिद्रय, दु:ख आणि अज्ञानाविरुद्ध उभी ठाकली होती. देशाच्या कानाकोप-यात सुरू असलेल्या त्या कामाने अनेक पिढया घडवल्या. स्वदेशी, श्रमप्रतिष्ठा, स्वभाषा, साधेपणा, सच्चेपणा आणि स्वबांधवांवरील असीम प्रेमामुळे, निष्ठेमुळे या गांधीवादी कार्यकर्त्यांनी समाजसुधारणा केल्या, पण आज स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटल्यानंतर या समाजसेवेची किंमत कमी झालेली दिसते. सगळीकडे बाजारीकरणाचे वारे वाहत असल्यामुळे समाजसेवा हा अनेकांच्या उपजीविकेचा मार्ग बनला आहे.
Read More …

चालणे ही प्रक्रिया तशी पाहिली तर अत्यंत साधी, पण आदिमानव जेव्हा चालण्याचे तंत्र शिकला तेव्हापासूनच ख-या अर्थाने मानवजातीच्या सर्वागीण विकासाला गती आली. हल्ली रस्ते गाडयावाल्यांच्या ताब्यात गेल्याने मात्र रस्त्यावर चालणे धोकादायक आणि कंटाळवाणे बनलेले दिसते. ‘जो चालतो, त्याचे नशीबही चालते’ अशी एक जुनी म्हण आहे. म्हणूनच महात्मा गांधी, विनोबाजी आवर्जून सांगायचे, ‘चरैवैती, चरैवैती.. चालत राहा!’

Read More …

अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी महिलांना सक्षम करण्याची प्रतिज्ञा केली आहे. मुली, तरुण आणि तमाम गरिबांकडे लक्ष देण्याचा मनोदय व्यक्त करून चिदंबरम यांनी महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे जाहीर केले आहे. शासनाची ही प्रामाणिक भूमिका लोकांच्या हिताची आहे; परंतु लोककल्याणासाठी अफाट खर्च करताना आमच्या नियोजनकर्त्यांनी समाजस्वास्थ्य बिघडवणा-या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. वाढते मद्यपान ही आपली राष्ट्रीय समस्या बनत चालली आहे. एकेकाळी ‘दारू पिणे’ ही गोष्ट गावाच्या वेशीबाहेर होती. ती आता थेट जाणत्या लोकांच्या घरात घुसली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण हे त्यामागील एक कारण आहे; परंतु त्याचबरोबर शासकीय पातळीवरील अनास्थासुद्धा देशातील दारूड्यांची संख्या वाढण्याला कारणीभूत आहे. आपला प्रगत ‘महाराष्ट्र’ तर गावोगावी उघडलेल्या बीयर शॉपींमुळे ‘मद्यराष्ट्र’ बनत चालला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही गावात संध्याकाळच्या वेळी जा, वाचनालयातील खुर्च्यांवर बसायला माणसे नसतात आणि त्याच परिसरातील मद्यालयात माणसांना बसायला खुर्च्या नसतात. नशेने होणा-या या सामाजिक दुर्दशेने आमची तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली आहे. नशेच्या अधीन झालेल्या तरुणाईला सुधारण्याऐवजी अप्पलपोटे ‘राज’कारणी हिंसेला प्रवृत्त करतात, असे दारुण चित्र राज्याच्या कानाकोप-यात पाहायला मिळते. ते बदलण्यासाठी जशी राजकीय इच्छाशक्ती हवी तशी दारूला मिळत चाललेली समाजमान्यताही कमी होणे गरजेचे आहे. बीयर, व्हिस्की वा वाइन आदी मादक पदार्थ आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीतून आले आहेत. त्यामुळे ते कसे, कधी आणि किती घ्यावेत, यासंदर्भात आपल्या समाजाचे संपूर्ण अज्ञान आहे. ते दूर करण्यासाठी आणि दारूचे धोके लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी एक व्यापक मोहीम उभारली पाहिजे..
Read More …

‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येशी मिळतीजुळती आहे. जागतिकीकरणाने आता राष्ट्रीय सीमा तोडून अवघे जग एकत्र आणलेले दिसते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या न्यायाने ‘लोकल टू ग्लोबल’ असा एक सांस्कृतिक परीघ निर्माण होताना दिसतोय. ही अठराव्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आता ख-या अर्थाने स्थिरावतेय. या सगळ्या प्रक्रियेत महाराष्ट्राला स्वत:चे असे एक स्थान आहे, हे इंग्लंडचे पंतप्रधान कॅमेरॉन यांच्या मुंबईभेटीने सिद्ध झाले. यांनी गुजरातमध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री मोदी यांनी ‘सॉलिड फिल्डिंग’ लावली होती. परंतु कॅमेरॉन तिकडे गेले नाहीत. ते मुंबईत आले, त्यांच्या काही दिवस आधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद येऊन गेले, दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट आर्थिक गुंतवणूक वाढावी यासाठी होती; कारण आजही भारतात गुंतवणूक करणा-या जगातील कोणत्याही उद्योगाची पहिली पसंती महाराष्ट्राला असते. महाराष्ट्राच्या या महत्त्वाचे आकलन जगभरातील लोकांना होते, पण राजकीय स्वार्थाने अंध झालेल्या मंडळींना गुजरातच्या प्रगतीचा उगाचच ‘गर्व’ वाटतो. म्हणूनच असेल कदाचित महाराष्ट्र नीटपणे न समजून घेणारे मुंबईचे नगरसेवक गुजरातमधील महापालिका बघायला निघाले आहेत.. जगभरातील बडया नेत्यांना ‘महाराष्ट्रवाद’ शिवरायांच्या भूमीत खेचून आणत असताना शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महापालिकेतील नगरसेवकांचे हे असे वर्तन छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणा-यांना शरमेचे वाटत नाही?

Read More …

‘नेमेचि येतो पावसाळा’ ही जशी म्हण सर्वश्रृत आहे, तद्वत पावसाळा आला की मुंबईतील सफाई कर्मचा-यांचा संप ठरलेलाच. विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तोंडावर विद्यापीठ वा शाळेतील गुरूजन संपावर जाणारच. जणू संपासारख्या ‘हट्टवादी’ धाग्याने रस्त्यावर साफसफाई करणारा अल्पशिक्षित कामगार आणि विद्यापीठातील प्राध्यापक यांना एका पंक्तीत बसवले आहे. वैयक्तिक हक्कांच्या आग्रहासाठी शिक्षण हे अडसर ठरावे, असे आमचे म्हणणे नाही. परंतु ज्यांच्या बौद्धिक कक्षा रुंदावतात त्यांनी स्वार्थापेक्षा राष्ट्राचा विचार करावा अशी साधी अपेक्षा आहे. दुर्दैवाने तसे घडत नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:च्या पोळीवर तूप हवे आहे. मग दुसरा उपाशी मेला तरी बेहत्तर अशी अवस्था सध्या सर्वत्र दिसतेय. २०-२१ फेब्रुवारीचा नियोजित देशव्यापी संप हा त्याच अतिरेकी स्वार्थाचा अविवेकी आविष्कार आहे. तो संप यशस्वी होवो न होवो, परंतु त्या संपाची घोषणा करताना कामगार संघटनांनी जो आव आणलेला आहे, तो खोटा आहे. लोकांना फसवणारा आहे. म्हणून आता कायद्यानेच ही संपाची मग्रुरी संपवली पाहिजे. देश वाचण्यासाठी ते पाऊल उचलणे गरजेचे बनले आहे.
Read More …

गेल्या दोनशे-चारशे वर्षापासून गरिबी हा जणू भारताच्या माथ्यावरील कलंक बनला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थिती बदलेल, अशी आशा होती.. पण आमच्या प्रगतीची गती मंदच राहिली. आमच्यापेक्षा वाईट परिस्थितीचा सामना केलेल्या चीन, दक्षिण कोरिया, मेक्सिको, इस्रायल, सिंगापूर आदी छोट्या-मोठ्या देशांनी गेल्या तीन-चार दशकांत नजरेत भरावी अशी भरारी मारली. आपली मात्र रांगत आणि रांगेत वाटचाल सुरू आहे. तिला वेळीच वेग दिला नाही, तर भावी पिढय़ा आपल्याला माफ करणार नाहीत. जगाच्या पाठीवरील सर्वच प्रगत राष्ट्रांनी सर्वांगीण प्रगती केली आहे. आपल्याकडे मात्र फक्त श्रीमंत हे अतिश्रीमंत आणि गरीब हे अधिकाधिक गरीब होताना दिसताहेत. असे असतानाही विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मात्र द्रारिद्र्याची समस्या महत्त्वाची न वाटता राम मंदिरासारख्या मुद्दय़ात अधिक रस वाटतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Read More …

आपल्याकडे रस्त्यावर होणा-या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्ते जणू काही ‘मृत्यूचे सापळे’ बनले आहेत. चुकीच्या पद्धतीने आखलेले आणि सदोष पद्धतीने बांधलेले महामार्ग वेगवान वाहनचालकांसाठी मृत्यूचे मार्ग ठरत आहेत. आपल्या देशात दरवर्षी एक लाख ३६ हजारहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यापैकी निम्मे लोक मोटारीत प्रवास करणारे तर साधारणत: ४६ टक्के मृत होणारे लोक दुचाकीस्वार किंवा रस्त्यावर चालणारे असतात. जगाच्या पाठीवर अन्य कोणत्याही देशात इतके जीवघेणे रस्ते पाहायला मिळत नाहीत. आपल्या देशात मात्र कुठेही जा, तुम्हाला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. आपल्याकडे होणा-या बहुतांश अपघातांची वेळ रात्रीची असते, असा आजवरचा समज आता अलीकडे बदलू लागलाय. दिवसा-उजेडी रस्त्यावर तडफडून मरणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातांमध्ये सर्व थरातील नामवंत लोकांचा आणि लोकप्रतिनिधींचा जीव जाऊ लागलाय.. आता तरी आम्ही जागे होणार की नाही?
Read More …



सेक्स हे सगळ्या मनोविकारांचं मूळ आहे, हे सांगणा-या सिग्मंड फ्रॉइडचं आकलन आजच्या आपल्या समाजाने करण्याची किती गरज आहे, हे सध्या भवताली घडणा-या घटनांवरून दिसून येतंय. मानवी हिंसक मनोवृत्तीमागे कामक्षुधा कारणीभूत असते, हे सांगणाराही फ्रॉइडच. या पार्श्वभूमीवर आमच्या तरुणाईची ‘कामक्षुधा’ भडकावणा-या सगळ्याच माध्यमांची आम्ही नव्याने मांडणी करणं आजच्या काळाची गरज आहे. ‘बीपी’ आणि ‘शाळा’सारखे चित्रपट याला चालना देतील?


Read More …

वीस वर्षापूर्वी देशातील अवघ्या १५ जिल्ह्यांमध्ये असलेला माओवाद आज एक तृतीयांश म्हणजे सुमारे २०० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. नक्षली कारवायांचा उपद्रव असलेल्या राज्यांची संख्या आज १७ झाली आहे. देशाच्या निमलष्करी दलाची मोठी शक्ती या बंदोबस्तासाठी खर्ची पडत आहे. गेल्या वर्षात हरक, गुंडेती शंकर, मन्गु पद्दम, विजय मडकम, सिद्धार्थ बुरागोहेन, अजय गन्जु, स्वरूपा, समिरा, अमीला, अरुणा हे महत्त्वाचे माओवादी मोहरे राखीव पोलिस दलांनी टिपले. सरकारी यंत्रणांचा रोख या रेड कॉरिडॉरवर आहे. मात्र हा उपद्रव असलेला इलाखा जरी जंगलातला असला तरी या अतिडाव्या विचारांचं रोमँटिक आकर्षण असलेला बुद्धिवाद्यांचा एक मोठाच वर्ग शहरांच्या अस्तन्यांमध्ये संचार करून आहे. त्यांच्याकडूनच जंगलातल्या या कारवायांना सर्व प्रकारचा रसदपुरवठा केला जातो. एवढंच नाही तर या विचारांचा संसर्ग आभासी बुद्धिवाद्यांमध्ये करून प्रस्थापित यंत्रणेतच ‘आपली’ माणसे यांनी तयार करून ठेवली आहेत. म्हणूनच पाकिस्तानी सैनिकांच्या अघोरी कृत्याचा सर्व थरांतून निषेध होत असताना माओवाद्यांनी लातेहारमध्ये राखीव पोलिस दलाच्या १० जवानांच्या केलेल्या निर्घृण हत्यांविरोधात मात्र फारसा गहजब होत नाही. आदिवासींचा सक्रिय पाठिंबा असलेली ‘सलवा जुडूम’सारखी चळवळ मानवाधिकाराची कारणं पुढे करून दाबून टाकली जाते. निवडणूक प्रक्रियेमध्ये डाव्यांची पीछेहाट होत असताना लोकशाही प्रक्रियेवर अविश्वासाचं धुकं पसरवून बंदुकीच्या नळीतून समांतर सत्तेचे प्रयोग १७ राज्यांमध्ये रक्तिमा दाखवू लागले आहेत. आता तर माओवाद्यांना बंदुकीपेक्षाही अधिक सक्षम अशा सिनेमाध्यमावर आपली पकड आवळायला सुरुवात केली आहे. रूपेरी माध्यमातून मटरूच्या तोंडवळ्याने माओ आता बुद्धिभेदासाठी सज्ज झाला आहे.
Read More …