Mahesh Mhatre

जगभरातील सोळा शहरांमध्ये घेण्यात आलेल्या प्रामाणिकपणाच्या चाचणीत आपल्या मुंबईने दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबईवर प्रेम करणा-या सर्वच लोकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. एरवी नको त्या गुन्हयांसाठी चर्चेत असणा-या मुंबईच्या या प्रामाणिकपणाचा प्रत्यय अनेकदा रिक्षा-टॅक्सी चालवणा-यांच्या वस्तू, पैसे, सोने परत करण्याच्या कृतीतून येत असतो. मुंबईकरांचा हा चांगुलपणा आणि कोणत्याही स्थितीत तडजोड करण्याची सहनशील वृत्ती अन्यत्र पाहायला मिळत नाही; कारण मुंबईचे चारित्र्य येथील उदार, दानशूर आणि समाजहितैषी श्रीमंतांच्या कार्यातून घडले आहे. या लक्ष्मीवंतांनी मुंबईकरांना आरोग्य, विद्या, संपन्नता आणि राजकीय सामर्थ्य लाभावे यासाठी आपला पैसा खर्च केला.. एकेकाळी सात बेटांची असणारी मुंबई आज सात शेठांची झालेली आहे.. तिच्या जीवावर उडया मारणा-या या धनिकांनी मुंबईच्या सव्वा कोटी लेकरांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ही मुंबा-आई जेवढी धनिकांना प्रिय तेवढीच तुम्हा-आम्हा सगळ्यांचीच आवडती आहे..



एखाद्या को-या कागदावर सरळ रेघ मारावी तसा दिसणारा निर्मनुष्य वाळवंटातील तो कंटाळवाणा रस्ता एका उंच टेकाडावर चढला, तशी आमची लिमोझीन गाडी थबकली. ‘चला उतरा, आपण गोलान टेकडयांच्या परिसरात आलो आहोत.’ आमच्या इस्त्रयलच्या दौ-यात वाटाडया असणा-या जाडगेल्या गृहस्थाने जाहीर केले, त्याक्षणी इस्त्रयल आणि त्याला वेढून असणा-या सबंध अरब राष्ट्रांमधील युद्धाच्या अनेक बातम्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. त्यामुळे दुपारच्या टळटळीत उन्हावर उत्साही मनाने मात करीत आम्ही शाळकरी मुलांप्रमाणे बाहेर पडलो. एकेकाळी शस्त्रयुद्धाच्या भयकारी आवाजाने कंपायमान होणा-या गोलान टेकडयांचा समूह शांतपणे निपचित पडला होता. रखरखीत वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर टेकडया भलेही उठावदार वाटत होत्या, पण माणसांचा वा प्राण्यांचा, वृक्षांचा किंवा पक्ष्यांचा अवती-भवती मागमूस नसल्याने त्या टेकडयांमध्ये अजिबात ‘जान’ नव्हती.. तेवढय़ात त्या उनतप्त शांततेचा भंग करीत एक मिलिटरीची जीप आमच्यापासून काही अंतरावर येऊन उभी राहिली. मनात असणा-या गोलान टेकडीसंबंधांच्या युद्धकथा आम्हा सगळ्यांच्या डोळ्यांतून चेह-यावर उतरलेल्या स्पष्ट दिसत होत्या. वातावरणात अचानक तणाव भरत असतानाच आमचा वाटाडया उत्तरला, ‘‘ओह, ते फक्त पॅट्रोलिंग करणारे सैनिक आहेत. या भागात युद्धकाळ संपल्यानंतरही नियमित गस्त घातली जाते.’’ ते ऐकताच सगळ्यांचे चेहरे तणावमुक्त झालेले दिसले. सगळ्यांना आणखी ‘रिलॅक्स’ करण्यासाठी मी विचारले, ‘‘त्या जीपमधील सैनिकांबरोबर कुणाला फोटो काढायचा आहे का?’’


त्या प्रश्नाला सगळ्यांकडून ‘हो’ येताच, मी त्या तरण्याबांड जवानांकडे गेलो. तारुण्यसुलभ मस्तीत मस्त असणा-या त्या चौघा सैनिकांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. माझ्या चाहुलीने तो भंगला. फोटोसाठी विनंती करताच त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता मान्यता दिली आणि पुढील दहा-पंधरा मिनिटे इस्रयलच्या दौ-यावर असलेल्या सर्वच्या सर्व दहा भारतीय आमदार-खासदार-पत्रकारांवर फोटो काढण्याचा एक कार्यक्रम पार पडला.. तेवढय़ात एक दाढीवाला सैनिक माझ्याजवळ आला आणि म्हणाला, भारतातून तुम्ही कुठल्या शहरातून आला आहात? मी उत्तरलो, ‘मुंबई.’ त्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो जवानगडी डोळ्यांत मिश्कील भाव आणून शुद्ध मराठीत उद्गारला, ‘मुंबई मला आवडते.’ विशाल वाळवंटाने वेढलेल्या युद्धबदनाम टेकडीवर भर उन्हात त्या वाक्याने माझ्या मनात मुंबईच्या आठवणींचे शीतल मेघ दाटून आले.. एव्हाना आमचे सारे शिष्टमंडळ गाडीच्या दिशेने निघाले होते.. मी मात्र त्या मुंबईच्या प्रेमात असणा-या इस्त्रयली सैनिकाशी बोलण्यात गुंतलो होतो. तो उत्स्फूर्तपणे बोलत होता.. मी एकदाच मुंबईत आलो होतो, दोन वर्षापूर्वी. मला ते शहर खूप आवडले. मला पुन्हा यायचे आहे. मराठीपण शिकायचे आहे, का, विचारा पाहू? त्याच्या त्या भाबडया सूचनेनुसार मी ‘का’ असा प्रश्न केला, त्यावर तो हसून म्हणाला ‘‘माझी होणारी पत्नी भारतीय वंशाची आहे. तिचे आई-वडील मुंबईतून इस्रयलमध्ये स्थलांतरित झालेले आहेत.. खरं सांगू का, तिला मुंबई आवडते, म्हणून मलाही..’’

‘रीडर्स डायजेस्ट’ या जगप्रसिद्ध मासिकातर्फे नुकत्याच घेतलेल्या ‘प्रामाणिकपणाच्या’ सर्वेक्षणात, जगातील न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, बर्लिन आदी सोळा शहरांमध्ये आपल्या मुंबईने जेव्हा दुसरा क्रमांक पटकावला त्या वेळी आधीच आवडलेली, आपलीशी झालेली ही महानगरी ‘माय मुंबई’ वाटू लागली.. होय, सध्या अवती-भवतीच्या वातावरणात सगळ्या नकारात्मक गोष्टींनी गर्दी केलेली असताना, मुंबईकरांच्या प्रामाणिकपणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव होणे, ही फक्त मुंबई, महाराष्ट्रासाठीच नाही, तर अवघ्या भारतवर्षासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सध्या आर्थिक क्षेत्रात होत असलेले चढ-उतार, रुपयाचे झालेले अवमूल्यन, भ्रष्टाचाराच्या उघडकीस येणा-या नवनव्या कहाण्या आणि सर्वसामान्य माणसाला भेडसावणारी महागाई यामुळे अवघे जीवन अस्थिर झालेले आहे; परंतु या अस्वस्थ वातावरणातही आमच्या मुंबईकरांचा प्रामाणिकपणा शाबूत असणे, ही साधी बाब नाही. ज्या ‘रीडर्स डायजेस्ट’च्या वतीने ही प्रामाणिकपणाची चाचणी घेतली जाते त्या संस्थेच्या वतीने जगातील वेगवेगळ्या भागातील सोळा शहरांमध्ये ज्या वर्दळीच्या जागा असतात, तेथे तीन हजार रुपये भरलेले पैशाचे पाकीट टाकण्यात येते, हॉटेल्स, फुटपाथ, रस्ते, मॉल आदी लोकांची सारखी जा-ये असणा-या ठिकाणी पैशाची पाकिटे ठेवण्यात येतात. प्रत्येक शहरात बारा ठिकाणे निवडून संस्थेचे प्रतिनिधी तेथे ही पाकिटे ठेवतात. त्यात पैशांसोबत एक दूरध्वनी क्रमांकही आवर्जून ठेवलेला असतो. यंदा या संस्थेने हेलसिंकी, मुंबई, बुडापेस्ट, न्यूयॉर्क, लंडन, वॉर्सा, बर्लिन, ल्युबजिएना, बुखारेस्ट, रिओ दि जानेरियो, झुरिक, प्राग, माद्रिद आणि लिस्बन या सोळा शहरांमध्ये त्या-त्या देशातील डॉलर वा युरोच्या स्वरूपात तीन हजार रुपये मूल्याची रक्कम ठेवली होती. त्यात फिनलंडमधील हेलसिंकी या शहरातून १२ पैकी ११ पाकिटे संस्थेला परत मिळाली, म्हणून त्या शहराला जगातील सगळ्यात प्रामाणिक शहराचा मान मिळाला. त्याखालोखाल आपल्या मुंबईकरांनी १२ पैकी नऊ पाकिटे परत करून आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला; परंतु श्रीमंतीचा गर्व करणा-या न्यूयॉर्क किंवा लंडन, बर्लिन वा लिस्बन आदी शहरांनी १२ पैकी आठ, पाच, चार आणि एक पाकीट परत करून आपली ‘वृत्ती’ दाखवली. थोडक्यात सांगायचे तर प्रामाणिकपणा आणि आर्थिक सुबत्ता याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. तो असतो, तुमच्या कौटुंबिक संस्कारांचा परिणाम. मुंबईतील शेअर बाजार वा हिरे व्यापारी यांच्याएवढाच आमचा डबेवालाही जगप्रसिद्ध आहे, तो याच प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेमुळे, त्यामुळे आपण ब-याचदा मुंबईकरांच्या या चांगुलपणाच्या बातम्या वाचतो त्या वेळी याच शहरात होणा-या वयस्कर लोकांच्या हत्या, घरफोडी, सोनसाखळी चोरीसारख्या वाईट प्रवृत्तीच्या वाढत्या प्रमाणाची चिंताही वाटत असते. तो भाग वेगळा; परंतु प्रत्येक शहराला स्वत:चे एक व्यक्तिमत्त्व असते आणि त्या स्वत:च्या खास वैशिष्टय़ांसह ते शहर वाढत असते, फुलत असते. मुंबईही तशीच गेल्या दोनेक हजार वर्षापासून विविध स्थित्यंतराचा अनुभव घेत वाढत आहे.

इ.स. १५० साली टॉलमी या अभ्यासू आणि जाणत्या भूगोलतज्ज्ञाने काढलेल्या नकाशात आपल्या मुंबईची नोंद केली गेली होती, तेव्हापासून आतापर्यंत हा सात बेटांचा समूह कसा बदलत गेला, हे पाहणे मोठे मजेशीर आणि मनोरंजक आहे. आजच्या मुंबईबद्दल बोलायचे झाले तर पूर्वी सात बेटांची मुंबई आता सात शेठांची बनलेली आहे. अंबानी, गोदरेज, लोढा, हिरानंदानी आदी शेठजींनी आपापसात वाटून घेतलेली ही महानगरी स्वभावत:च प्रामाणिक असल्यामुळे तिला या शेठ-सावकारांच्या दुर्गुणांचा संसर्ग झालेला नाही, ही या शहरात राहणा-यांची जमेची बाजू मानली पाहिजे.

टॉलमीने जागतिक नकाशावर मुंबईची नोंद केली, त्याला आता १८६३ वर्षे झाली आहेत. इ.स. १५० मध्ये दक्षिण महाराष्ट्र सातवाहनांच्या ताब्यात होता. ‘गाथा सप्तशती’ लिहून म-हाटी संस्कृतीचे अनेक पैलू अजरामर करणा-या राजा हळाचा तो काळ. अगदी इ.स. २२० पर्यंत त्यांचे राज्य दक्षिण महाराष्ट्रात तग धरून होते. त्यानंतर मौर्य, चालुक्य राष्ट्रकुट, शिलाहार, देवगिरीचे यादव यांनी तेराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर पर्यायाने मुंबईच्या आसपासच्या प्रदेशावर अधिराज्य गाजवले. १३१७ मध्ये आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या टोळधाडीने आमच्या यादवरायांच्या राजसत्तेला नष्ट करून महाराष्ट्राला इस्लामी अंमलाखाली आणण्याची सुरुवात केली. त्यामुळे मुंबईनेही बहामनी आणि गुजरातमधील महमद बेगडासारख्या सुलतानांच्या राजवटींचा अनुभव घेत, पोर्तुगीजांच्या वर्चस्वाचा स्वीकार केला. पुढे जून १६६१ मध्ये पोर्तुगालच्या राजाने आपली मुलगी इंग्लंडच्या दुस-या चार्ल्सला देताना, मुंबई शहरही हुंडा म्हणून दिले. त्या साडेपाचशे वर्ष जुन्या घटनेची आठवण भलेही पोर्तुगालचे लोक विसरले असतील; परंतु आमच्या राज्यकर्त्यांनी मात्र नेमकी ती गोष्ट चांगलीच लक्षात ठेवली आहे, त्यामुळे आजही कोणत्याही लग्नाच्या निमित्ताची वाट न पाहता, मुंबई हिरानंदानी वा लोढांसारख्या जावईबापूंना ‘आंदण’ देण्याची पद्धत सुरू असलेली पाहायला मिळते.

अर्थात या मुंबई महानगराने अनेक चांगले लोक पाहिले. म्हणून सात बेटांचा समूह ज्याला १७०० साली गव्हर्नर सर निकोलस बेट याने ‘अतिदरिद्री आणि मोडकळीस आलेले असे बेट’ म्हटले होते, ते आज महानगर बनले आहे. १६६४ साली ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला व्यापारी शहर बनविण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यासाठी एक खूप मोठी घटना कारणीभूत ठरली होती. ती म्हणजे पाच जानेवारी १६६४ रोजी छत्रपती शिवाजी राजे यांनी सुरतेवर स्वारी केली होती. महाराजांनी सुरतेचे व्यापारी महत्त्व जाणून मुगल, इंग्रजांसह सर्वच परकीय वसाहतवादी लोकांचे मर्मस्थळ फोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. रायगडापासून सुरतेपर्यंतचे अंतर घोडयावरून पार करून छत्रपतींच्या फौजा सुरतेवर धडकल्या; परंतु त्याआधी संपूर्ण शहरात मराठयांच्या हेरांनी आपले जाळे पसरले असेल, त्यामुळे सुरतेतील पेढया वखारी आणि श्रीमंत लोकांच्या हवेल्यांमध्ये कधी आणि कसा प्रवेश करायचा याची परिपूर्ण माहिती मावळ्यांना मिळाली होती. जेम्स ग्रँड डफ याने १८२६ मध्ये लिहिलेल्या ‘मराठयांच्या इतिहासात’ महाराजांच्या सुरतेच्या स्वारीबद्दल खास वर्णन वाचायला मिळते.

डफच्या मते आठ हजार सैनिकांसह आलेल्या शिवाजी राजांच्या स्वारीने सुरतेचा मुगल सरदार घाबरून गेला होता. आपले शहर वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने शिवबा राजांवर मारेकरी धाडले आणि तीच चूक त्याच्या अंगाशी आली. ‘अखंड सावध’ असणा-या शिवबा राजांच्या संरक्षण कवचामुळे मुगल सरदारांचा तो दुष्ट हेतू फसला; परंतु त्यामुळे मराठा सैन्यात जो संतापाग्नी पेटला, त्यात निम्म्याहून अधिक सुरत जळून खाक झाले. सतत सहा दिवस मराठयांच्या टाचेखाली आलेल्या सुरतची सगळी ‘सूरतच’ बदलून गेली होती आणि त्याच प्रसंगाने भेदरून गेलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने सुरत सोडली. आणि दुसरे सुरक्षित बंदर म्हणून मुंबईचा विकास करण्याची योजना केली. त्या वेळी पाण्याने भरलेली सात बेटे अशी मुंबईची स्थिती होती. १६७२ मध्ये डॉ. फ्रायर यांनी मुंबईला भेट दिली. त्या वेळी त्यांचे मुंबईबद्दलचे मत काय होते, तर ‘येथे आसपास खाजणे, खाडया असल्यामुळे हवा सर्द आणि रोगट आहे. जमीन चांगली नसल्यामुळे अन्नधान्य वगैरे काही पिकत नाही. कित्येक लोक तर मुंबईला यमपुरी म्हणतात.’ असे डॉ. फ्रायर यांनी लिहून ठेवले आहे; परंतु जेरॉल्ड अँजियर या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्तबगार अधिका-याने आपल्या हुशारीच्या, हिमतीच्या बळावर मुंबईच्या विकासाचा पाया घातला. परिणामी साडेतीनशे वर्षात यमपुरी मायापुरीत रूपांतरित झाली.

इंग्रजांच्या कंपनी सरकारने समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या भौगोलिक स्थितीचा व्यापारासाठी जेवढा फायदा करून घेतला, तेवढाच त्यांना स्वसंरक्षणासाठीही ही भौगोलिक ठेवण उपयुक्त ठरली. अन्यथा जेव्हा अठराव्या शतकात मराठी फौजांनी अवघा हिंदुस्थान आपल्या टाचांखाली आणला होता, त्यातून मुंबईही सुटली नसती. मात्र इंग्रजांनी आरमारी व्यवस्थेत मिळवलेले प्रावीण्य, बंदुका-तोफांसारखी आधुनिक हत्यारे यामुळे इंग्रजांना मराठयांच्या आक्रमणापासून वाचता आले. परिणामी सतराव्या आणि अठराव्या शतकात मुंबईतून मसाल्याचे पदार्थ, कापूस, खनिज संपत्ती आदी कच्चा माल, सोने-चांदी आदी वस्तू इंग्लंडमध्ये पाठवण्याचा कंपनी सरकारने सपाटा लावला. भारतातील पैसा आणि कच्चा माल याच्या बळावर इंग्लंडात औद्योगिक क्रांतीचे भोंगे वाजू लागले होते. म्हणूनच आर्थिक उलाढालीचे केंद्र बनू लागलेल्या मुंबई बेटाचे वेगाने शहरात आणि पुढे महानगरात रूपांतर झाले.

मुंबईच्या जडणघडणीला खरा वेग १९ व्या शतकात मिळाला. इंग्रजांनी सबंध देशभरात आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यामुळे भारताच्या आर्थिक पिळवणुकीचा त्यांना खुला परवाना मिळाला होता. भारतीय उद्योगधंदे नष्ट करून इंग्रजांनी स्थानिक बाजारपेठ काबीज केली होती आणि हा स्वस्तात कच्चा माल घेण्याचा आणि मनमानेल त्या भावात पक्का माल विकण्याचा धंदा सुलभ व्हावा यासाठी नवनवीन शोध, संशोधन आणि सुविधा शोधण्यात येत होत्या. तार, पोस्ट, रेल्वे आणि संरक्षण व्यवस्था मजबूत झाल्याने मुंबईचे स्वरूप १९ व्या शतकात पार बदलून गेले होते. १८५३ साली मुंबई ते ठाणे अशी रेल्वे सर्वप्रथम धावली. सबंध आशिया खंडातील त्या पहिल्या रेल्वेने मुंबईला ‘चाक्या म्हसोबा’ हा देव दिला, त्या वेळी वाफेच्या इंजिनावर चालणारी ती रेल्वे पाहायला शेकडो लोक लोहमार्गाच्या दुतर्फा उभे राहून ‘सायबाचा पो-या मोठा अकली, बिनबैलाने गाडी कशी ढकली?’ असा स्वत:लाच प्रश्न विचारीत. रेल्वेच्या आगमनाने मुंबई आणि मुंबईकरांच्या जगण्याला वेग प्राप्त झाला. त्यापाठोपाठ १८६१-६५ दरम्यान घडलेल्या अमेरिकन यादवीने मुंबईला ख-या अर्थाने महानगर बनवले. या युद्धामुळे जागतिक अर्थकारणात झालेल्या उलथापालथीने मुंबईकर व्यापा-यांची अक्षरश: चांदी झाली आणि त्या श्रीमंतीतूनच मुंबईत गॉथिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहिल्या. रेल्वे आणि गॉथिक शैलीच्या इमारती या दोन्हींची उभारणी व्यापा-यांच्या पैशातून झाली होती. आपण या शहराचे, या शहरातील लोकांचे काही तरी देणे लागतो या भावनेतून रुग्णालये, धर्मशाळा, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, रस्ते असे एकाहून एक प्रकल्प या शहरात धनिकांच्या माध्यमातून उभे राहिले. त्यात जे धार्मिक होते, त्यांनी मठ-मंदिरे बांधण्यात आणि त्यांचे संवर्धन करण्यात पुढाकार घेतला, पण त्यांच्यापेक्षा प्रागतिक विचारसरणी असणा-या मानवतावादी श्रीमंतांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईचे व्यक्तिमत्त्वही उदार आणि सर्वसमावेशक बनले. फोर्टमधील डेव्हिड ससून वाचनालय, हे डेव्हिड आणि अल्बर्ट ससून या ज्यूधर्मीय धनवंत पिता-पुत्रांच्या देणगीतून आकारास आले. सर्वसामान्य मुंबईकरांना कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी जगन्नाथ शंकरशेट यांनी पुढाकार घेऊन ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’ची पायाभरणी केली. नाना तिथेच थांबले नाहीत, त्यांनी देशी लोकांना कायद्याची पदवी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला. आज ज्या शेठ लोकांनी मुंबईला आपली बटिक बनविण्याचा प्रयत्न चालवला आहे, ते सारे भारतीय कायद्याची हवी तशी पायमल्ली करताना दिसतात. त्या वेळी आमच्या नाना शंकरशेटयांच्या मनाच्या श्रीमंतीचे आणि उदारतेचे कौतुक वाटते. मुंबईच्या आरोग्य रक्षणार्थ जे.जे. रुग्णालय आले. टाटा उद्योग समूहाने तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, एनसीपीए टाटा थिएटर, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्चसारख्या उत्तमोत्तम संस्था स्थापून मुंबईला एक आर्थिक राजनाधी- सोबत एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण जसा काळ बदलला तसे मुंबईचे श्रीमंत लोकही बदलले. त्यांनी भारतीय धर्मशास्त्रात आणि गांधी तत्त्वज्ञानात सांगण्यात आलेली ‘विश्वस्त’ ही संकल्पना बासनात गुंडाळून ठेवली, परिणामी नव्याने श्रीमंती लाभलेल्या मुंबईकरांनी आपली श्रीमंती आपल्या कुटुंबीयांपुरती मर्यादित ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज मुंबईत सर्वसामान्य माणसाला चांगली सेवा देतील अशी रुग्णालये, डायलिसिस केंद्रे, कमी फीमध्ये उत्तम शिक्षण देतील अशा शाळा, महाविद्यालये, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणा-या तंत्रशाळा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सर्वागीण जीवनाचा अभ्यास करणारी संशोधन केंद्रे नव्याने उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी धनिकांच्या मुठीत अडकलेली लक्ष्मी, सहजपणे मोकळी होणे ही काळाची गरज आहे. रस्त्यावरचा मुंबईकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणा जपतोय, हे एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

मग आमच्या मुंबापुरीतील धनिकांनीही आपल्या पूर्वसुरींच्या सामाजिक कार्याला स्मरून मुंबईकरांचे जीवन सुखी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला काय हरकत आहे?

Categories:

Leave a Reply