डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमी होत आलेली किंमत, हा सध्या सर्वच भारतीयांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक स्तरावर झालेल्या आर्थिक उलाढालींमुळे रुपया घसरला हे मान्य. परंतु १९४७ साली डॉलरच्या बरोबरीने असलेला रुपया जेव्हा स्वातंत्र्याला सहा दशके उलटल्यानंतर एक डॉलरला साठ रुपये होतो, तेव्हा आमच्या आर्थिक नियोजनाचे अपयश ठळकपणे समोर येते. भारतात मोगल राजे राज्य करत होते, तेव्हाही अशी स्थिती नव्हती. रे. टेरी नामक युरोपियन प्रवासी १६१५ ते १६१८ या दरम्यान भारतात फिरत होता. निरनिराळया राज्यांत फिरणा-या या चाणाक्ष माणसाने तत्कालीन भारताबद्दल लिहिले आहे की, ‘या देशात पैसा येण्याची अनेक द्वारे सतत वाहत असून येथील पैसा बाहेर नेणे, हा मोठा गुन्हा समजला जातो. हिंदुस्थानात व ब्रह्मदेशात त्या वेळी या गुन्ह्याबद्दल सक्तीचे कायदे होते.’ आपण सध्याची स्थिती पाहिली तर आमच्या लोकनियुक्त लोकशाहीत मोगल बादशहांच्या काळाच्या बरोबर उलट स्थिती आहे. देशातील पैसा अनंत वाटांनी बाहेर जातोय. त्या काळया पैशाच्या ग्रहणातून ज्या दिवशी भारतीय अर्थव्यवस्था बाहेर येईल, त्या वेळी ‘रुपया’ला चांदीची झळाळी पुन्हा प्राप्त होईल.
बुद्धगयेतील बोधीवृक्ष आणि वज्रासन यांना बौद्ध धर्मात खूप महत्त्व आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी वैशाख पौर्णिमेला बुद्धगयेत लाखो लोक दर्शनासाठी गोळा झाले होते. साधारणत: त्याच सुमारास आपल्या केंद्रिय गुप्तचर विभागाने बुद्धगयेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्धधर्मीय आणि मुस्लिमांमधील संघर्षाची पार्श्वभूमी या स्फोटांना असल्याचे बोलले जात आहे. जिथे बुद्धवंदना व्हायची, तिथेच हिंसाचारी स्फोट घडवले गेले. या पार्श्वभूमीवर तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रज्ञा-शिल व करुणेच्या उपदेशाची आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची आजही किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.
भारत स्वतंत्र झाला, त्या वेळी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते, ‘विकासाच्या वाटेवर शेती उद्योगाने मागे पडून चालणार नाही.’ १९४८ मध्ये महात्मा गांधी यांनी ‘गरिबांच्या भाकरीतच भगवान आहे,’ असे गर्जून सांगितले होते. पंडितजींच्या नंतर पंतप्रधानपदी आलेल्या लालबहादूर शास्त्री यांनी आठवडयातून एक वेळ उपवास करून, गरिबांबद्दल वाटणारी सहानुभूती कृतीने व्यक्त केली होती. या महानायकांच्या आदर्शानुसार इंदिरा गांधी यांनी देशाला भूकमुक्त करण्याचा ध्यास घेतला. नंतरच्या काळात हरित क्रांतीने समस्त देशाला समृद्धीचे स्वप्न दाखवले. दुर्दैवाने कोटयवधी गरिबांना या विकासमार्गाने चकवा दिला. ते अज्ञान, दारिद्रय, उपासमार आणि भूकबळींच्या चौफेर गर्तेत फिरत राहिले. आता स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतर का होईना, सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने ग्रामीण भारतातील ७५ टक्के आणि शहरी क्षेत्रातील ५० टक्के गोरगरिबांना ‘अन्न सुरक्षा’ देण्याचा निर्णय झाला आहे.. हिंदुत्ववादी राजकारण दुर्दैवाने मंदिरातल्या मूर्तिभोवतीच फिरते. पण भाकरीतील भगवानाला, जो आजवर श्रीमंतांच्या चिरेबंदी वाडयात बंदिस्त होता त्याला, गरिबाच्या झोपडीत नेण्याचा हा निर्णय, भारताच्या भविष्याला कलाटणी देणारा ठरेल!

.jpg)
